नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:27 IST2026-04-08T12:27:12+5:302026-04-08T12:27:43+5:30
नेपाळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे तिथल्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारण तस्करी आणि अवैध कारवायांच्या तक्रारी बऱ्याच काळापासून येत होत्या.

नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
नेपाळ प्रशासनाने भारत-नेपाळ सीमेवरील वाहतुकीवरील निर्बंध पुन्हा एकदा कडक केले आहेत. आता भारतीय नोंदणी क्रमांक असलेल्या दुचाकींना नेपाळमध्ये प्रवेश करताना प्रवेश परवाना घेणे बंधनकारक असेल. त्याशिवाय निश्चित कालावधीसाठी पासही जारी केला जाईल. या आधारावर केवळ मुख्यालय परिसरापर्यंतच फिरण्याची परवानगी दिली जाईल तर आत प्रवेश करताना सीमा शुल्क भरणे अनिवार्य असेल.
भारतीय वाहन चालकांना नेपाळमध्ये प्रवेश करताच एक पास दिला जाईल. त्यावर स्पष्टपणे वेळेचा उल्लेख असेल. मालंगवा येथे सीडीओ रामू राज कादरिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या महापौरांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय दुचाकी प्रवेशाला आणि वाहतूक पास देण्यावर एकमत झाले.
काय आहे नवीन नियम?
नेपाळमध्ये आधीपासूनच एक तरतूद होती, ज्यानुसार भारतीय वाहनांना प्रवेशावेळी नोंदणी करणे आणि ठराविक वेळेत परत जाणे आवश्यक होते. प्रवासाला फक्त मुख्यालय क्षेत्रापर्यंतच परवानगी होती तर पुढील कोणत्याही प्रवासासाठी सीमाशुल्क मंजुरी आवश्यक होती. पूर्वी हा नियम केवळ सामान्य लोकांसाठी मर्यादित होता आणि प्रभावशाली लोक व समाजकंटक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करत असत. मात्र आता नेपाळमधील बालेंद्र सरकारच्या कठोर भूमिकेमुळे या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. भारतीय वाहने नेपाळमध्ये प्रवेश करताच त्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतर वाहनचालकांना पास दिला जाईल. त्यांना मुख्यालयापर्यंत फिरण्याची परवानगी असेल. नियम मोडणाऱ्या भारतीय वाहनांविरोधात कारवाई केली जाईल.
दरम्यान, नेपाळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे तिथल्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारण तस्करी आणि अवैध कारवायांच्या तक्रारी बऱ्याच काळापासून येत होत्या. या कठोर पावलामुळे अशा घटकांना आळा बसेल अशी लोकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु जास्त कर आणि महागडी वाहने टाळण्यासाठी भारतीय नातेवाईकांच्या नावावर किंवा दुहेरी नागरिकत्वाच्या आधारावर भारतीय वाहने नेपाळमध्ये उघडपणे ठेवली जात आहेत आणि चालवली जात आहेत ही सर्वात मोठी समस्या आहे. ही भारतीय वाहने गुन्हेगारीचे स्रोतही ठरली आहेत. इतकेच नाही तर माफिया गुन्हेगार भारतीय हद्दीतून चोरलेली वाहने सहजपणे नेपाळमध्ये आणू शकतात.
भारतीयांमध्ये संताप
या नियमामुळे काही भारतीय नागरिकांमध्ये नाराजीही निर्माण झाली आहे. भारतीय वाहनांवर अधिक कठोर निर्बंध लादले जात आहेत तर नेपाळी वाहने भारतात मुक्तपणे फिरत आहेत. नेपाळी वाहनांच्या भारतातील प्रवेशासाठीही असेच नियम लागू करावेत अशी मागणी स्थानिकांमध्येही होत आहे. सीमावर्ती भागापर्यंत वाहतुकीला परवानगी द्यावी परंतु प्रवेशावेळी कर किंवा प्रवेश शुल्क अनिवार्य करावे असं भारतीयांचे म्हणणं आहे.