ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. मात्र ४ दिवसांच्या संघर्षानंतर भारत-पाकिस्तानात सीजफायरची घोषणा करण्यात आली. भारताच्या हल्ल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने सीजफायरची विनंती केली, ती भारताने मान्य केली. मात्र आता पाकिस्तानसमोर नवं आव्हान निर्माण झाले आहे. बलूचिस्तानच्या चाघी जिल्ह्यात गुरुवारी जे दृश्य समोर आले त्यातून दक्षिण आशियात पुन्हा एकदा अशांतता निर्माण होण्याची परिस्थिती दिसून येत आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अफगाणिस्तानचे सैन्य पाकिस्तानी सीमेत घुसले असून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची बातमी समोर आली. हा संघर्ष इतका चिघळला आहे की दोन्ही देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती बनली आहे. चाघी हा तोच भाग आहे जो बलूचिस्तानात डूरंड लाईनजवळ स्थित आहे. डूरंड लाईन ज्याला अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने अवैध घोषित केले होते. इथूनच अफगाणी सैन्य पाकिस्तानात घुसल्याचे समोर आले. या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैन्य मारले गेले आहे. याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत पुष्टी मिळाली नाही.
क्वेटा आणि पेशावर तालिबानचा दावा
अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार डूरंड लाईन मानण्यास तयार नाही. त्यांनी ही सीमा अवैध असल्याचं म्हटलं नाही तर क्वेटा आणि पेशावरसारख्य पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर दावाही केला आहे. पाकिस्तानी सैन्य वारंवार सीमेत घुसखोरी करते असा तालिबानचा आरोप आहे. त्यावर तहरीक ए पाकिस्तान आणि तालिबान मिळून आमच्या सैन्यावर आणि चौक्यांवर हल्ला करते असा पलटवार पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानला दुहेरी फटका
पाकिस्तानात आधीच बलूचिस्तान लिबरेशन आर्मी आणि TTP सारख्या दहशतवादी संघटनांकडून दुहेरी मार बसत आहे. दिवसेंदिवस त्यांच्या सैन्य तळांवर हल्ले होत आहेत अशावेळी अफगाणी सैन्य पाकच्या सीमेत घुसखोरी करून गोळीबार करत असल्याने पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आधीच ताणले गेलेत. डिसेंबर २०२४ मध्ये खोस्त आणि पक्तिया येथे झालेल्या चकमकीत १९ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. आता चाघी जिल्ह्यातील चकमक त्याचाच पुढचा भाग मानली जात आहे.
२ तास गोळीबार
स्थानिक माध्यमांनुसार, बलूचिस्तानच्या हेलमंद सीमेवर २ तास गोळीबारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने छोट्या शस्त्रांचा वापर केला. गोळीबारीनंतर पाकिस्तानकडून सीमेवर नव्या चौक्यांच्या बांधकामाचे काम थांबवण्यात आले. कुठल्याही किंमतीत आम्ही डूरंड लाईनजवळ पाकिस्तानला नवीन चौकी बांधून देणार नाही असं तालिबानने सांगितले आहे.