'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 22:25 IST2025-05-31T22:24:48+5:302025-05-31T22:25:32+5:30
भारताने बेकायदेशीर प्रवेशाविरुद्ध कठोर कारवाई सुरू केल्यामुळे नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना भारत-नेपाळ सीमेवर प्रवास करू नये असा इशारा दिला आहे.

'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्याच नागरिकांना एक नवीन इशारा दिलाय. यामध्ये त्यांना भारत-नेपाळ सीमा भागात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिलाय. काही दिवसात भारताने बेकायदेशीर सीमा ओलांडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केल्यानंतर हा इशारा दिला. गेल्या एका महिन्यात दूतावासाकडून असा हा तिसरा इशारा दिला.
चीनी दूतवासाने शुक्रवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. "वारंवार इशारा देऊनही काही चिनी नागरिक सीमा भागात प्रवास करत आहेत, ज्यामुळे त्यांना बेकायदेशीर प्रवेशाच्या आरोपाखाली अनेक प्रकरणांमध्ये ताब्यात घेण्यात आले, असंही यात म्हटले.
"भारत आणि नेपाळचे नागरिक सीमापार प्रवासादरम्यान ओळखपत्र दाखवून एकमेकांच्या देशात प्रवास करू शकतात, परंतु हा नियम परदेशी नागरिकांना लागू होत नाही. चीनने आपल्या नागरिकांकडे वैध भारतीय व्हिसा असल्याशिवाय ते नेपाळमधून भारतात प्रवास करू शकत नाहीत, अशा सूचना दिल्या.
चीनी दूतावासाने म्हटले आहे की, भारतात बेकायदेशीर प्रवेशासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. जरी एखाद्या व्यक्तीने अजाणतेपणे भारतीय सीमेत प्रवेश केला तरी त्याला अटक केली जाऊ शकते आणि दोन ते आठ वर्षांचा तुरुंगवास किंवा मोठा दंड होऊ शकतो. याशिवाय, या प्रकरणात जामिनाची तरतूद नाही.