नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील सहकाऱ्याला भेटून पीएम मोदी भावुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 17:55 IST2026-02-08T17:54:51+5:302026-02-08T17:55:36+5:30
पंतप्रधान मोदींनी आपल्या दोन दिवसीय मलेशिया दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद फौजेचे ज्येष्ठ नेते जयराज राजा राव यांची भेट घेतली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील सहकाऱ्याला भेटून पीएम मोदी भावुक, म्हणाले...
Narendra Modi Malaysia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसीय मलेशिया दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेचे (INA) ज्येष्ठ नेते जयराज राजा राव यांची रविवारी(दि.८) कुआलालंपूर येथे भेट घेतली. या भेटीचे फोटो पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत. या वेळी पंतप्रधान मोदींनी नेताजी आणि आजाद हिंद फौजेच्या धाडसी महिला-पुरुषांच्या असाधारण शौर्य, वारसा आणि बलिदानाबद्दल सर्व भारतीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
भेट अत्यंत खास आणि प्रेरणादायी
भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आजाद हिंद फौजेच्या शूर महिला-पुरुषांचे आपण सदैव ऋणी आहोत. त्यांच्या पराक्रमाने भारताचे भविष्य घडवले. पंतप्रधानांनी जयराज राजा राव यांच्याशी झालेल्या भेटीला ‘खूप खास’ आणि ‘शानदार’ असे संबोधले. त्यांचे आयुष्य अपार साहस आणि त्यागाने भरलेले आहे. त्यांचे अनुभव ऐकणे अत्यंत प्रेरणादायी होते, असेही त्यांनी नमूद केले.
नेताजींच्या भाषणाने तरुणांना दिली प्रेरणा
उल्लेखनीय बाब म्हणजे, सप्टेंबर १९४३ मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी कुआलालंपूरमधील सेलांगोर पाडांग (दातारान मर्देका / इंडिपेन्डन्स स्क्वेअर) येथे हजारोंच्या उपस्थितीत जोशपूर्ण भाषण केले होते. या भाषणाने अनेक तरुणांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. जयराज राजा राव हेही त्याच प्रेरित तरुणांपैकी एक होते. त्यांनी नेताजींच्या आजाद हिंद फौजेत सहभागी होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले.
मलेशिया दौऱ्यात द्विपक्षीय सहकार्याला चालना
पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसीय मलेशिया दौऱ्यावर असून, या दौऱ्यात संरक्षण व सुरक्षा, सेमीकंडक्टर, तसेच व्यापार अशा क्षेत्रांमध्ये भारत-मलेशिया सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान काही नवीन उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.