सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 09:44 IST2025-06-29T09:43:48+5:302025-06-29T09:44:34+5:30
भारताबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यास इच्छुक

सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांसदर्भात हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानने मात्र या निर्णयाचे स्वागत केले असून सिंधू जल वाटप कराराच्या मुद्यावर भारतासोबत चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. भारतासोबतच्या सिंधू जल करारा (आयडब्ल्यूटी) संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा घडवून आणण्यास इच्छुक असल्याचे शनिवारी पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले.
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
पाकिस्तानसोबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठीच्या तथाकथित संरचनेला आम्ही कधीही मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट करत भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळून लावला आहे.
किशनगंगा व रतेल या दोनही जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात पाकिस्तानाच्या आक्षेपाबद्दल आंतरराष्ट्रीय लवादाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.
जबाबदारीपासून पाकिस्तान काढतोय पळ
आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लक्ष्य केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अनेक दशकांपासून पाकिस्तान फसवणूक करत आला आहे. कथितरीत्या १९६०च्या सिंधू कराराअंतर्गत स्थापन झालेल्या अवैध मध्यस्थी न्यायालयाने याचे उघडपणे उल्लंघन करत जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किशनगंगा व रतेल जलविद्युत प्रकल्पासंदर्भात पूरक निर्णय दिला आहे.
भारताने कधीही या तथाकथित आंतरराष्ट्रीय लवादाला मान्यता दिली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले. त्यात १९६० चा सिंधू जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय सामाविष्ट होता. आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपल्या अधिकाराचा निर्णय घेत भारताने हा करार स्थगित केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
लवादाचा निर्णय काय?
एप्रिलमध्ये सिंधू जल करार रद्द करण्यासंदर्भात भारताने घेतलेला निर्णय हा संबंधित प्रकरणावर निर्णय घेण्याच्या आमच्या अधिकारावर मर्यादा घालू शकत नाही.
या संदर्भात भारताने घेतलेला निर्णय हा सर्व पक्षांसाठी बंधनकारक नसल्याचे आंतरराष्ट्रीय लवादाने स्पष्ट केले होते.
किशनगंगा, रतेल प्रकल्प आराखड्यावर आक्षेप ?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल वाटप करार रद्द केला होता. त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय लवादाकडे दाद मागितली होती.
पाकिस्तानने आयडब्ल्यूटी अंतर्गत किशनगंगा व रतेल या दोन्ही जलविद्युत प्रकल्पांच्या आराखड्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, या संदर्भातील आंतरराष्ट्रीय लवादाच्या कारवाईला कधीही भारताने मान्यता दिली नाही.