'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:29 IST2025-05-11T14:28:43+5:302025-05-11T14:29:29+5:30
India-Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या तणावानंतर शनिवारी युद्धविरामची घोषणा करण्यात आली.

'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
India-Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या तणावानंतर शनिवारी(10 मे) युद्धविरामची घोषणा करण्यात आली. यानंतर आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रविवारी एक मोठे विधान केले आहे. भविष्यात भारतासोबत चर्चा झाली, तर काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवादासारखे प्रमुख मुद्दे उपस्थित करू, असे आसिफ यांनी म्हटले आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले, 'आम्ही युद्धविरामचे पालन करू, मात्र भविष्यात भारतासोबत चर्चा झाल्यावर काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवाद, या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.' विशेष म्हणजे, या मुद्द्यांवर यापूर्वी अनेकदा भारताची पाकिस्तानसोबत चर्चा झाली आहे. मात्र, पाकिस्तान नेहमी भारताचा विश्वासघातच करत आला आहे. भारतासोबतच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचा संदर्भ देत होते, ज्यावर यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली होती परंतु कोणताही निर्णायक निकाल लागला नव्हता.
दोन्ही देशांमध्ये युद्धविराम
पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानने युद्धविराम जाहीर करुन सर्व लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. जर हा युद्धविराम कायमस्वरुपी शांततेच्या दिशेने पहिले पाऊल ठरली, तर ती एक सकारात्मक संकेत मानली जाईल, असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले. पण, त्यांनी असेही म्हटले की, आत्ताच काहीही सांगणे घाईचे ठरेल.