‘’भारताने CEPC उद्ध्वस्त करण्यासाठी ८० अब्ज दिले, रॉ ने ७०० दहशतवादी तयार केले’’
By बाळकृष्ण परब | Updated: November 14, 2020 16:33 IST2020-11-14T15:53:40+5:302020-11-14T16:33:31+5:30
India-Pakistan LOC News : ऐन दिवाळीत पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून वातावरण बिघडवले आहे. या तणावाच्या परिस्थितीदरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्या्ंनी भारतावर मोठा आरोप केला आहे.

‘’भारताने CEPC उद्ध्वस्त करण्यासाठी ८० अब्ज दिले, रॉ ने ७०० दहशतवादी तयार केले’’
इस्लामाबाद - ऐन दिवाळीत पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून वातावरण बिघडवले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या आगळीकीत भारताच्या काही जवानांना वीरमरण आले आहे. तसेच काही सर्वसामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तरदाखल चोख उत्तर दिले असून, यात पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. दरम्यान, या तणावाच्या परिस्थितीदरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्या्ंनी भारतावर मोठा आरोप केला आहे. बलुचिस्तानमध्ये भारत दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी आणि लष्कराच्या प्रवक्त्याने केला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार भारतीय गुप्तहेर यंत्रणा रॉ ने चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CEPC) उद्ध्वस्त करण्यासाठी तब्बल ८ हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच भारताने ७०० जणांची एक संघटना बनवली आहे. ही संघटना बलुचिस्तानमध्ये सीपीईसी ला लक्ष्य करत राहील. भारताने गिलगिट बाल्टिस्थानमधील निवडणुकांपूर्वीच तिथे राष्ट्रवादाचा भडका उडवण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीनंतरही भारताचा इरादा चांगला दिसत नाही आहे.
दरम्यान , पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील उरी विभागापासून गुरेजपर्यंत अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता. यामध्या पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर भारताच्या प्रत्युत्तर गोळीबारात पाकिस्तानचे आठ जवान ठार झाले आहेत. दरम्यान, भारतीय लष्कराने एलओसीवर पाकिस्तानचे हत्यारांचे साठे, इंधनाचे साठे आणि दहशतवाद्यांचे लाँच पॅड नष्ट केले.