'जैश' म्हणतं, आम्ही केला हल्ला... इम्रान खान भारताला म्हणतात, पुरावे द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:22 IST2019-02-19T14:18:51+5:302019-02-19T14:22:30+5:30
पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'जैश' म्हणतं, आम्ही केला हल्ला... इम्रान खान भारताला म्हणतात, पुरावे द्या!
इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्याऐवजी त्यांनी भारतालाच खडे बोल सुनावले आहेत. भारतावर हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा होणार ?, पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही, कुठलेही पुरावे नसताना भारत पाकिस्तानवर आरोप करत सुटला आहे. भारतानं पहिल्यांदा आम्हाला पुरावे द्यावेत, मग आम्ही कारवाई करू, असंही इम्रान खान म्हणाले आहेत.
तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची भारताबरोबर चर्चेची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. परंतु जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनंच स्वतः पुलवाम्यात घडवून आणलेल्या हल्ल्याची कबुली दिली आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान यासंदर्भात भारताकडे पुरावे मागत असल्यानं देशपातळीवरून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या धर्तीवरूनच दहशतवाद पोसला जातोय. दहशतवाद्यांना पाकिस्तान हा देशच आश्रय देत असल्याचं नेहमीच सिद्ध झालं आहे. पुलवामा हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास राजकीय लाभ मिळू शकतो.
मात्र पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव आला असून, भारताकडूनही आक्रमक कारवाईसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बाळगलेले मौन सोडत आज देशाला संबोधित केले. या संबोधनामध्ये इम्रान खान यांनी पुलवामा हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला.