Imran Khan: आधीची बायको म्हणते, इम्रान खानने पाकची वाट लावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 09:19 IST2022-04-02T09:19:03+5:302022-04-02T09:19:32+5:30
रेहाम खान यांची कठोर टीका

Imran Khan: आधीची बायको म्हणते, इम्रान खानने पाकची वाट लावली!
इस्लामाबाद : पंतप्रधानइम्रान खान यांनी पाकिस्तानची पुरती वाट लावली आहे. त्यांच्या कारभारामुळे या देशात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे, अशी कडक टीका त्यांची घटस्फोटित पत्नी रेहाम खान यांनी केली. हा गोंधळ दूर करण्यासाठी आता पाकिस्तानच्या जनतेने एकवटले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
मित्रपक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटने (एमक्यूएम) पाठिंबा काढून घेतल्याने इम्रान सरकार अविश्वास ठरावावरील रविवारी होणाऱ्या मतदानाआधीच अल्पमतात गेले. नवा पाकिस्तान निर्माण करू, असा नारा देत सत्तेवर आलेले इम्रान खान देशातले मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले असल्याची टीका विरोधकांनी केली. त्यांच्या सुरात सूर मिसळत रेहाम खान यांनी म्हटले की, इम्रान यांच्याकडे पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याइतकी बुद्धिमत्ता व पात्रता कधीही नव्हती.
मला आयुष्यात कीर्ती, पैसा सारे मिळाले. मला अजून काही मिळवायची इच्छा नाही. मात्र, पाकिस्तानला समर्थ राष्ट्र बनविण्याची माझी इच्छा आहे. महान राष्ट्र होण्याच्या दिशेने पाकिस्तानची झालेली वाटचाल मी बालपणापासून पाहत आलो आहे, असे इम्रान खान यांनी गुरुवारी म्हटले होते. त्याबद्दल रेहाम यांनी टोला लगावला की, इम्रान खान पंतप्रधानपदी नव्हते, त्याआधी पाकिस्तान नक्कीच महान देश होता! (वृत्तसंस्था)
आरोप करणाऱ्या रेहाम खान आहेत कोण?
इम्रान खान यांची माजी पत्नी रेहाम खान या पत्रकार, लेखक व
चित्रपट निर्मात्या आहेत. ब्रिटनमधील एजाझ रेहमान यांच्याशी रेहाना
यांचा पहिला विवाह झाला; पण तो टिकला नाही. त्यानंतर रेहाम यांनी २०१५ साली इम्रान खान यांच्याशी दुसरा विवाह केला. मात्र, कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला.
‘आता इतिहासजमा होणार, ते सपशेल अपयशी’
n रेहाम खान यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या राजकारणातून इम्रान खान आता इतिहासजमा होणार आहेत.
n इम्रान खान यांना स्तुतिपाठक प्रिय आहेत. क्रिकेट असो वा बाॅलिवूड तिथे उत्तम कामगिरी महत्त्वाची असते. राजकारणाचेही तसेच आहे. इम्रान खान राजकारणात सपशेल अयशस्वी ठरले.