भारताने झुगारल्या चिनी ‘साैर कुबड्या’; आयात ७६ % घटली, आता देशातच निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 07:24 IST2023-09-17T07:23:59+5:302023-09-17T07:24:15+5:30
चीनच्या उत्पादनांवर भारताला अवलंबून राहायचे नाही

भारताने झुगारल्या चिनी ‘साैर कुबड्या’; आयात ७६ % घटली, आता देशातच निर्मिती
नवी दिल्ली : भारताचा सध्या स्वच्छ आणि अपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर भर आहे. त्यासाठी आत्मनिर्भर हाेण्याच्या दिशेने सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. साैरऊर्जेसाठी आवश्यक असलेल्या साैर पॅनलची चीनकडून हाेणारी आयात सुमारे ७६ टक्क्यांनी घटविली आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविणे आणि चीनवरील अवलंबन कमी करण्याच्या दृष्टिकाेनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक ऊर्जा क्षेत्रातील थिंक टॅक म्हणून ओळखली जाणारी संस्था ‘ॲम्बर’ने यासंदर्भात जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, देशात साैर पॅनलचे उत्पादन वाढले आहे. चीनच्या उत्पादनांवर भारताला अवलंबून राहायचे नाही. त्यामुळे तेथून हाेणारी आयात घटविण्यासाठी धाेरणात्मक वातावरण तयार करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत.