"भारताने जर बांगलादेशवर हल्ला केला तर पाकिस्तान त्याचे प्रत्युत्तर देईल"; कुणी दिला इशारा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:42 IST2026-01-30T16:41:53+5:302026-01-30T16:42:34+5:30
India vs Pakistan Bangladesh Violence: भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानने घेतली उडी

"भारताने जर बांगलादेशवर हल्ला केला तर पाकिस्तान त्याचे प्रत्युत्तर देईल"; कुणी दिला इशारा?
India vs Pakistan Bangladesh Violence: मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश पूर्णपणे पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे. ज्या पाकिस्तानच्या अत्याचारांपासून भारताने बांगलादेशला मुक्त केले, तोच पाकिस्तान आता त्याचे रक्षण करण्याचा बाता करताना दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पक्षाच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे नेते कामरान सईद उस्मानी यांनी भारताला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले की जर भारताने बांगलादेशवर हल्ला केला तर पाकिस्तान पूर्ण ताकदीने त्याचे प्रत्युत्तर देईल. मे २०२५मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला.
भारताला दिला इशारा
"त्या लोकांनी उस्मान हादीला शहीद केले, पण ते त्याची विचारसरणी शहीद करू शकले नाहीत. बांगलादेशच्या लोकांनी भारतीय स्वातंत्र्य पूर्णपणे नाकारले आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. जर कोणताही देश बांगलादेशवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बांगलादेशच्या स्वायत्ततेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर पाकिस्तानचे लोक तुमच्यासोबत उभे राहतील. मी इशारा देतो की जर कोणी बांगलादेशकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस केले, तर पाकिस्तानी जनता, पाकिस्तानी सैन्य आणि आमची क्षेपणास्त्रे प्रत्युत्तर देतील," असा इशारा उस्मानी यांनी दिला.
बांगलादेशला पाठिंबा जाहीर
कामरान सईद उस्मानी यांनी पाकिस्तानच्या ध्वजाजवळ बांगलादेशचा ध्वज लावलेला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये ते भारताला धमकी दिसतात. ते म्हणतात, "आज मी कोणतेही राजकीय विधान करणार नाही. आज मी राजकारणी म्हणून नव्हे तर बांगलादेशची माती, इतिहास, त्याग आणि धैर्याला सलाम करणारा व्यक्ती म्हणून बोलत आहे. २०२१ मध्ये जेव्हा मी ही मोहीम सुरू केली, तेव्हा कोणीही माझ्यासोबत नव्हते. आज बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्र आहेत. बांगलादेशला कोणत्याही देशाची वसाहत बनू देणार नाही. बांगलादेशात कुणाचीही दादागिरी चालणार नाही. बांगलादेशला कुणाचेही गुलाम बनू देणार नाही."
मुस्लीम तरुण आता फसणार नाही
"या प्रदेशातील सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा एखादा मुस्लिम तरुण उठतो आणि एक प्रभावशाली आवाज बनतो, तेव्हा त्याला दाबले जाते. हे भारतीय राजकारणी, लोकांचे रक्त शोषण्यासाठी त्यांना कधीही गुलामगिरीतून मुक्त करू इच्छित नाहीत. मग ते बांगलादेशला जाणारा पाणीपुरवठा बंद करणे असो किंवा फितना-ए-खवारीजच्या नावाखाली मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभे करणे असो. आता, मुस्लिम तरुणांना हे षड्यंत्र चांगलेच समजले आहे. आता हे चालणार नाही," असे उस्मानी म्हणाले.