‘शुभ वार्ता’; मैत्रिसंबंध पूर्ववत होतील...’; भारत-बांगलादेश संबंधांना कलाटणी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 09:22 IST2026-02-14T09:21:19+5:302026-02-14T09:22:05+5:30
भारतीय राजनैतिक व सामरिक वर्तुळात सकारात्मक स्वागत; शेख हसीना यांच्या राजवटीच्या पाडावामुळे बांगलादेश झाला होता अस्थिर; धर्मांध शक्तींचे वाढले होते वर्चस्व

‘शुभ वार्ता’; मैत्रिसंबंध पूर्ववत होतील...’; भारत-बांगलादेश संबंधांना कलाटणी मिळणार
नवी दिल्ली - बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (बीएनपी) स्पष्ट बहुमत मिळाल्याने भारत-बांगलादेश संबंधांमध्ये गेल्या १८ महिन्यांतील तणावानंतर सकारात्मक कलाटणी येण्याची शक्यता असल्याचे सामरिक तज्ज्ञांचे मत आहे.
दोन दशकांनंतर बीएनपी पुन्हा सत्तेत येण्याच्या मार्गावर आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीचा अंत झाला आणि त्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी, अस्थिरता व अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडली. या विजयाचे भारतीय राजनैतिक वर्तुळात सकारात्मक स्वागत होत आहे. अनेक माजी भारतीय राजदूत आणि सामरिक तज्ज्ञांनी या निकालाला बांगलादेशच्या जनतेसाठी आणि भारत-बांगलादेश संबंधांसाठी ‘शुभ वार्ता’ म्हटले आहे.
‘जनतेच्या भावना निकालातून व्यक्त’
भाजप खासदार व माजी परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी निकालाला चांगली बातमी म्हटले. हे केवळ बांगलादेश आणि तेथील जनतेसाठीच नव्हे, तर बांगलादेशचे मित्र असणाऱ्यांसाठीही चांगले आहे. जनतेच्या भावना या निकालातून स्पष्ट झाल्या आहेत, असे ते म्हणाले. माजी उच्चायुक्त वीणा सिक्री यांनी जमात-ए-इस्लामीला जनतेने नाकारले. बीएनपीला दोन-तृतीयांश बहुमत मिळणे म्हणजे लोकशाही मूल्यांना पाठिंबा असल्याचे नमूद केले आहे.
सर्वसमावेशक बांगलादेशला पाठिंबा : काँग्रेस
बीएनपीच्या विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकशाही, सर्वसमावेश बांगलादेशाला भारतीयांचा पाठिंबा राहील, अशी प्रतिक्रिया दिली. भारत आणि बांगलादेश यांच्यात इतिहास, भाषा, संस्कृती आणि विविध सामायिक मूल्यांचे घट्ट नाते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशशी संबंध अधिक दृढ करू : चीन
नव्या सरकारसोबत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची चीनने तयारी दर्शवली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीन बांगलादेशाच्या अंतर्गत राजकीय अजेंड्याला पाठिंबा देतो आणि चीन-बांगलादेश रणनीतिक सहकार्य भागीदारी पुढे नेण्यासाठी ढाकासोबत काम करण्यास तयार आहे, असे म्हटले आहे.
सार्वभौमत्व, लोकशाहीला पाठिंबा : पाक
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रहमान यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. दक्षिण आशिया आणि त्यापलीकडे शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी द्विपक्षीय संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या नेतृत्वासोबत काम करण्यास पाकिस्तान उत्सुक असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या मतांचा गोषवारा
लोकशाहीचे पुनरुज्जीवन : तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ चाललेली राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेच्या प्रश्नांनंतर झालेली ही निवडणूक बांगलादेशला स्थिरतेकडे नेईल.
मैत्रीचे नवे पर्व : बांगलादेशात सेवा बजावलेल्या अनेक माजी राजदूतांनी बीएनपीचा विजय भारत-बांगलादेश संबंधांना बळकट अधिक करण्याची संधी देईल असे म्हटले आहे.
अल्पसंख्याकांचे रक्षण : ऑगस्ट २०२४ मधील संघर्षानंतर अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, नव्या सरकारकडून सुरक्षा व स्थिरतेची अपेक्षा आहे.
प्रादेशिक शांतता : हा सत्तापालट दक्षिण आशियातील क्षेत्रीय शांतता व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.