दोन लाख लोकांना वर्षाला पुरेल, इतक्या पाण्याची होतेय वाफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:58 PM2019-07-26T19:58:01+5:302019-07-26T20:02:37+5:30

ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.

global warming and climate change | दोन लाख लोकांना वर्षाला पुरेल, इतक्या पाण्याची होतेय वाफ!

दोन लाख लोकांना वर्षाला पुरेल, इतक्या पाण्याची होतेय वाफ!

googlenewsNext

ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही.
वाढत्या तापमानामुळे आपलं स्वच्छ पिण्याचं पाणी जवळपास संपुष्टात यायला लागलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्वच्छ पाण्याची वाफ होण्याचा वेग इतका भयानक आहे, की त्यामुळे काही वर्षांत पाण्याचे साठे कोरडेठाक होऊ शकतात.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सुमारे दोन लाख लोकांना पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतक्या पाण्याची केवळ वर्षभरातच वाफ होतेय!
भारतात पावसामुळे वर्षभरात सुमारे चार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी आपल्याला मिळतं. त्यातल्या जवळपास अर्ध्या पाण्याची उष्णतेमुळे वाफ होते.

‘नॅशनल कमिशन ऑन इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट’च्या अहवालानुसार दोन वर्षांपूर्वी खुद्द सरकारनेच ही आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार दरवर्षी पावसामुळे जे चार हजार अब्ज घनमीटर स्वच्छ पाणी उपलब्ध होतं, त्यातील २१३१ अब्ज घनमीटर पाणी उष्णतेमुळेच उडून जातं. जे १८६९ अब्ज घनमीटर पाणी उरतं, त्यातील केवळ ११२३ अब्ज घनमीटर पाणी वापरण्यायोग्य असतं. त्यातीलही फक्त ६९९ अब्ज घनमीटर पाणी भूपृष्ठावर राहातं, तर ४३३ अब्ज घनमीटर पाणी जमिनीखाली जातं.

केवळ वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याचं संकट इतकं गंभीर होत चाललंय, पण या गोष्टींकडे कोणाचंच गांभीर्यानं लक्ष नाही.
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे निसर्गाचं सगळं चक्रच उलटंपालटं होत असताना माणसाच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं करतं आहे. भुपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचे साठे वेगाने खालावत चालले आहेत. आपल्या भावी पिढ्यांसमोर तर जलसंकटाचा धोका खूपच मोठा आहे.

सरकारच्याच अनुमानानुसार आणखी सहा वर्षांनी म्हणजे २०२५मध्ये भारताच्या जवळपास १३९.४ कोटी लोकसंख्येसाठी वर्षाला प्रतिव्यक्ति केवळ १३४१ घनमीटर पाण्याची उपलब्धता असू शकेल. भारतात २०११मध्ये प्रतिव्यक्ति पाण्याची हीच उपलब्धता १५४५ घनमीटर होती. त्याचवेळी एशियन रिसर्च डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूटनं आंतरराष्ट्रीय मानकांचा हवाला देऊन इशारा दिला आहे की, ज्या देशांत प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ति पाण्याची उपलब्धता १७०० घनमीटरपेक्षा कमी आहे, ते देश जलसंकटग्रस्त देश आहेत.
 

Web Title: global warming and climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.