पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:46 IST2025-06-21T11:46:08+5:302025-06-21T11:46:59+5:30
पाकिस्तानमध्ये चार हिंदू मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले असून मुलीच्या आईने जबरदस्तीने धर्म बदलल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. येथील शहदादपूरमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. २२ वर्षीय जिया बाई, २० वर्षीय दिया बाई आणि १६ वर्षीय दिशा बाई यांच्याव्यतिरिक्त, या तीन बहिणींचा १३ वर्षीय भाऊ हरजीत कुमार याचे अपहरण करून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मुलांची आईने न्यायाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे. शाहदादपूर येथे एका हिंदू कुटुंबातील चार भावंडांचे अपहरण झाले होते. पीडितांच्या आईने स्थानिक संगणक शिक्षक फरहान खासखेलीवर मुलांना आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप केला. "मला तीन मुली होत्या आणि फरहानने त्या सर्वांना घेऊन गेला," असे तिने डोळ्यात अश्रू आणत सांगितले. आईने तिच्या १३ वर्षांच्या मुलाला परत आणण्याची विनंती केली, यावेळी त्या म्हणाल्या की, इतक्या लहान वयात धर्म समजू शकत नाही. तिने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या मुलांचे तथाकथित "धर्मांतर" दाखवले आहे, याला अनेकांनी "सांस्कृतिक दहशतवाद" म्हटले आहे. हिंदू पंचायत प्रमुख राजेश कुमार यांनी ही घटना केवळ कौटुंबिक शोकांतिका नसून एक सामुदायिक आपत्ती असल्याचे म्हटले. त्यांनी पीडितांचे फोटो शेअर केले आहेत. 'ही मुले स्वेच्छेने धर्म बदलण्याचा निर्णय घेण्याइतकी प्रौढ आहेत का?', असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पोलिसांची कारवाई आणि पाक मीडियाचा दावा
पाकिस्तानी मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, कुटुंबाच्या निषेधानंतर पोलिसांनी या मुलांना शहदादपूर येथील न्यायालयात हजर केले. दोन प्रौढ मुलींना आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले, तर एका अल्पवयीन मुली आणि मुलाला त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पाक मीडियाचा दावा आहे की या चार भावंडांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने धर्म बदलला आहे. पोलिसांच्या दबावामुळे मुले घाबरली आहेत असे कुटुंबाचे म्हणणे आहे.