धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:08 IST2025-06-12T13:07:14+5:302025-06-12T13:08:10+5:30
झेलम नदीवरील मंगला धरण आणि सिंधू नदीवरील तुर्बेला धरण ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशयं आता कोरडी पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० मधील सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे गंभीर परिणाम आता पाकिस्तानवर दिसून येऊ लागले आहेत. झेलम नदीवरील मंगला धरण आणि सिंधू नदीवरील तुर्बेला धरण ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशयं आता कोरडी पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणच्या (IRSA) माहितीनुसार, बुधवारी पाकिस्तानला आपल्या प्रमुख जलस्रोतांमधून मिळणाऱ्या पाण्यापेक्षा सुमारे ११,१८० क्युसेक अधिक पाणी सोडावे लागले. या अतिरिक्त वापरामुळे पंजाब आणि सिंध या महत्त्वाच्या प्रांतांमधील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर थेट परिणाम झाला आहे.
पाकिस्तानची झाली कोंडी!
दरम्यान, भारताने आपल्या बाजूने असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील धरणांमध्ये फ्लशिंग आणि स्वच्छतेची कामे सुरू केली असून, त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आणखी घट झाली आहे. भारताने पाकिस्तानसोबत पाण्याच्या प्रवाहावरील माहिती शेअर करणंही थांबवलं आहे, जे पूर्वी सिंधू करारानुसार नियमित होत असायचं.
आयआरएसएच्या आकडेवारीनुसार, सध्या पाकिस्तानमध्ये एकूण २,४१,६११ क्युसेक पाणी येत आहे, तर २,५२,७९१ क्युसेक पाणी वापरले जात आहे, त्यामुळे दररोजचा तुटवडा मोठा आहे. पंजाबला यावर्षी १,१४,६०० क्युसेक पाणी मिळाले, जे गेल्या वर्षीच्या १,४३,६०० क्युसेकच्या तुलनेत २० टक्के कमी आहे. सिंध प्रांतातही अशीच टंचाई अनुभवली जात आहे.
पाण्यावाचून पाकिस्तानमध्ये हाहाकार
याआधी आयआरएसएच्या सल्लागार समितीने १ मे ते १० जून या कालावधीसाठी २१% पाणीटंचाईचा इशारा दिला होता. आता जून ते सप्टेंबर अखेर ही टंचाई ७% दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचे अनुमान वर्तवण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या टंचाईचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. पाण्यावाचून आता पाकिस्तानमध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे.