Congress Shashi Tharoor News: ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारताने केवळ पाकिस्तानला नाही, तर जगाला आपल्या ताकदीची एक झलक दाखवली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याचा चंग बांधलेल्या केंद्र सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले. या सर्वांवर कळस म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’. यानंतर पाकिस्तानने अनेक दावे केले. परंतु, भारताने सर्व दावे फेटाळून लावले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पुरावेही दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’वरून देशांतर्गत राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर विविध प्रश्नही उपस्थित केले. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. परंतु, आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही राहुल गांधी यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत जगभरातील देशांना माहिती देण्यासाठी भारतातील खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये आहे. शशी थरूर यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ अमेरिकेत असून, वॉशिंग्टन येथे पत्रकारांशी बोलताना शशी थरूर यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. एका पत्रकाराने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना विचारले की, भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडच्या संघर्षादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कथित मध्यस्थी प्रयत्नांचा मुद्दा सतत उपस्थित केला जात आहे. तुमचा पक्ष यासंदर्भात सातत्याने सवाल करत आहे. तुमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले की पंतप्रधान मोदी ट्रम्पसमोर ‘सरेंडर’ केले.
भारताला कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही
याला उत्तर देताना शशी थरूर म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आदर करतो. असे म्हणू शकतो की, आम्ही कोणालाही मध्यस्थी करण्यास सांगितले नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाची भाषा करत राहील, तोपर्यंत आम्हालाही पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही. जर त्यांना दहशतवादासाठीच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करायच्या असतील, तरच त्यांच्याशी चर्चेचा विचार केला जाऊ शकतो. पाकिस्तानला भारताशी सामान्य संबंध हवे आहेत हे त्यांनी दाखवून दिले, तर संवाद करण्यास हरकत नाही. परंतु, यासाठी भारताला कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही. आम्हाला थांबायला सांगण्याची गरज नव्हती, असे शशी थरूर यांनी नमूद केले.
दरम्यान, मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि म्हणाले की, मोदीजी काय करत आहात? नरेंदर, सरेंडर, त्यानंतर जी हुजूर म्हणत नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याचे पालन केले. तुम्हाला एक काळ माहिती असेल जेव्हा फोन नाही तर सातवे आरमार आले होते. मात्र तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मला जे करायचे आहे ते मी करेन. हाच फरक आहे. यांचे व्यक्तिमत्त्वच असे आहे. यांना स्वातंत्र्याच्या काळापासून सरेंडरवाले पत्र लिहिण्याची सवय आहे. थोडासा दबाव आला की, हे लोक लगेच सरेंडर करतात. काँग्रेस पार्टी सरेंडर करत नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. ही मंडळी सरेंडर करणारी नाही तर महाशक्तीसोबत लढणारी होती.