India Pakistan ceasefire Update: भारत पाकिस्तान यांच्यात लष्करी पातळीवर चर्चा झाल्यानंतर सीमेवरील तणाव निवळला आहे. दोन्ही देशात शस्त्रसंधी करण्यावर सहमती बनली. या शस्त्रसंधीबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पाकिस्तानच्या संसदेत मोठं विधान केले. दोन्ही देशात झालेल्या चर्चेनुसार १८ मेपर्यंत शस्त्रसंधी वाढवण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीनेही याबद्दल वृत्त दिले आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात रविवारपर्यंत म्हणजे १८ मेपर्यंत शस्त्रसंधी वाढवण्यावर एकमत झाले आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री काय बोलले?
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीही पाकिस्तानच्या संसदेत दोन्ही देशातील शस्त्रसंधीबद्दल माहिती दिली.
"10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये डीजीएमओ स्तरावर चर्चा झाली. त्यात १२ मेपर्यंत शस्त्रसंधी करण्यावर एकमत झाले होते. १२ मे रोजी जी चर्चा झाली, त्यात १४ मेपर्यंत शस्त्रसंधी करण्यावर एकमत झाले. १४ मे रोजी पुन्हा चर्चा झाली आणि त्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी वाढवण्याला दोन्ही देशांनी होकार दिला आहे. ही सहमती पूर्ण सहमती नाहीये. जोपर्यंत राजनैतिक स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार नाही, तोपर्यंत ही पूर्ण सहमती बनणार नाही", असेही ते म्हणाले.
वाचा >>"मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उडवल्यानंतर पाक लष्कराने हवाई हल्ले केले होते. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढला होता. याचे रुपांतर लष्करी संघर्षात झाले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक हवाई दलाच्या तळांना लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानकडून चर्चेचा प्रस्ताव आला होता.