"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:40 IST2025-11-17T08:39:13+5:302025-11-17T08:40:32+5:30
Sheikh Hasina Final Verdict, Son Sajeeb Wazed: शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी

"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
Sheikh Hasina Final Verdict, Son Sajeeb Wazed: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) शेख हसीना यांच्यावरील आरोपांवर निकाल जाहीर करणार आहे. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होईल की नाही हे आज ठरवले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण निकालापूर्वी शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी इशारा दिला आहे की न्यायालय शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देऊ शकते, परंतु त्या भारतात सुरक्षित आहेत. जर त्यांच्या पक्षावरील बंदी उठवली नाही, तर त्यांचे समर्थक पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये अडथळा आणतील, असा इशाराही त्यांनी दिला.
शेख हसीना यांच्यावर कोणते आरोप आहेत?
शेख हसीना यांच्यावर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात प्राणघातक कारवाईच्या संदर्भात खटला सुरू आहे. त्यांच्याविरुद्धचा पहिला आरोप खून, हत्येचा प्रयत्न, छळ आणि इतर अमानवी कृत्यांशी संबंधित आहे. दुसऱ्या आरोपात असा दावा आहे की हसीना यांनी आंदोलकांना संपवण्याचे आदेश दिले. या आरोपांमध्ये विद्यार्थ्यांना प्राणघातक शस्त्रे वापरण्याचे निर्देश देणे आणि प्रक्षोभक भाषणे देणे यांचा समावेश आहे. इतर आरोपांमध्ये सहा निःशस्त्र आंदोलकांची हत्या आणि गोळीबार यांचा समावेश आहे. शेख हसीना यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, हे सर्व राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हणले आहे.
कदाचित मृत्युदंड, पण माझी आई भारतात सुखरूप!
"आम्हाला नेमका काय निकाल लागणार आहे हे माहित आहे. ते टीव्हीवर दाखवत आहेत. ते शेख हसीना यांना दोषी ठरवतील आणि कदाचित मृत्युदंडाची शिक्षा देतील. पण तरीही ते माझ्या आईला काहीही करू शकत नाहीत. माझी आई भारतात सुरक्षित आहे. भारत तिला पूर्ण सुरक्षा पुरवत आहे," असे वाजेद यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये रॉयटर्सला मुलाखत देताना म्हटले.
शेख हसीना यांचे निर्वासित जीवन
७८ वर्षीय शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर नवी दिल्लीत निर्वासित जीवन जगत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, त्या वर्षी झालेल्या निदर्शनांमध्ये जवळपास १,४०० लोक मारले गेले होते, त्यापैकी बहुतेक जण सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात मारले गेले होते.
अनेक भागात संघर्ष
सजीब वाजेद यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत तरूणांच्या व कार्यकर्त्यांच्या भावनांची माहिती दिली. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनात दडपशाही करण्यात आली आणि त्यात अनेक जण मृत्यूमुखी पडले, यासाठी शेख हसीना यांचे सरकार जबाबदार आहे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी होणार आहे. त्याच्याच आधी त्यांच्या मुलाने मुलाखत देत इशारा दिला आहे. शेख हसीना यांच्याविरुद्ध निकालापूर्वी देशातील अनेक भागात हिंसक संघर्ष, जाळपोळ, रास्ता रोको आणि स्फोटही झाले, ज्यामुळे देशभरात असुरक्षितता असल्याची भावना आहे, असे सजीब वाजेद यांनी अधोरेखित केले.