अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 22:02 IST2024-12-30T22:01:33+5:302024-12-30T22:02:50+5:30
या मच्छिमारांविरोधातील खटलेही मागे घेतले जाणार आहेत.

अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका
Bangladesh News : सुमारे अडीच महिन्यांपूर्वी बांग्लादेश तटरक्षक दलाने पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील काकद्वीप येथून बांग्लादेशच्या हद्दीत शिरलेल्या 95 भारतीय मच्छीमारांना अटक केली होती होते. पण, आता भारताच्या इशाऱ्यानंतर बांग्लादेशातील मोहम्मद युनूस सरकारने कैद केलेल्या त्या सर्व मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
खटले मागे घेणार
यापूर्वी गुरुवारी बांग्लादेशच्या गृह मंत्रालयाच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपसचिव लुत्फुन नाहर यांनी एका अधिसूचनेत सांगितले होते की, बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने सागरी मत्स्यपालन कायदा, 2020 अंतर्गत 95 मच्छिमारांविरोधात दाखल केलेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मच्छिमारांकडून जप्त केलेले सहा ट्रॉलर्सही(बोटी) परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
ममता बॅनर्जींनी उपस्थित केला होता मुद्दा
मच्छिमारांच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना भारतात परत आणण्यासाठी कारवाई करण्याबाबत बोलल्या होत्या. राज्याच्या बाजूने केंद्र सरकारचेही लक्ष वेधण्यात आले. यानंतर आता अखेर बांग्लादेश सरकारने त्या 95 मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारदेखील भारतात अडकलेल्या 90 बांग्लादेशी मच्छिमारांना सोडण्याची तयारी करत आहे.