'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 21:14 IST2025-06-05T21:13:48+5:302025-06-05T21:14:24+5:30
भारताला पाकिस्तानची आर्थिक प्रगती सहन होत नाही. त्यामुळे भारत छुप्या युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप बलूचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
क्वेटा - पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी भारतावर मोठा आरोप लावला आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा RAW नं पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी 'फितना अल हिंदुस्तान' या दहशतवादी संघटनेला फंडिग करत असल्याचा पोकळ आणि खोटा दावा केला. फितना अल हिंदुस्तान ही संघटना पाकिस्तानात शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करण्याचं काम करते. विशेषत बलूचिस्तानातील संवेदनशील भागात ही कार्यरत आहे असं सरफराज बुगतींनी म्हटलं.
बुगती यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला, त्यावेळी बलूचिस्तानचे मंत्री जहूर अहमद बुलेदी आणि मुख्य सचिवही हजर होते. मीर सरफराज बुगती म्हणाले की, फितना अल हिंदुस्तान एक दहशतवादी संघटन असून तिचा बलूचिस्तान अथवा बलूच समुदायाशी कुठलाही संबंध नाही. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही ऑडिओही ऐकवले. ज्यात संघटनेतील २ कार्यकर्ते शानबे आणि रहमान गुल कथित रॉ अधिकाऱ्याशी बोलत असल्याचं म्हटले. खुजदारमध्ये झालेला हल्ला, जिथे लहान मुलांचा जीव गेला तो या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केला. त्या हल्ल्यात रॉ ची महत्त्वाची भूमिका होती असा दावा त्यांनी केला.
तसेच भारताला पाकिस्तानची आर्थिक प्रगती सहन होत नाही. त्यामुळे भारत छुप्या युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत पुरस्कृत हे षडयंत्र बलूच लोकांच्या आडून पाकिस्तानचे तुकडे करू पाहते पण बलूच समाज या कारवायांचे समर्थन करत नाही असा दावाही बुगती यांनी केला. या पत्रकार परिषदेत बुगती यांनी बलूचिस्तान लिबरेशन आर्मीचाही उल्लेख केला. त्यात गायब झालेल्या यादीत अनेक स्वेच्छेने भूमिगत झाल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, काही लोकांना बळजबरीने गायब करून जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारचे धोरण विकासावर आधारित आहे परंतु जे राज्याविरोधात शस्त्र उचलत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करू. राज्य या संघटनेच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानच्या शांततेत, विकासाच्या मार्गावर कुठलेही षडयंत्र यशस्वी होणार नाही असंही मुख्यमंत्री बुगती यांनी सांगितले.