बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:06 IST2025-11-06T18:05:21+5:302025-11-06T18:06:14+5:30
संतप्त विद्यार्थ्यांनी टायर जाळले, जाळपोळ केली आणि तोडफोड केली आणि पाकिस्तान सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. ही निदर्शने नेपाळ आणि बांगलादेशमधील Gen Z आंदोलनासारखीच होती.

बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z तरुणाईने आंदोलन पुकारले आहे. मोठ्या प्रमाणात युवक सरकारविरोधात आक्रोश करत रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये काही आठवड्यांपूर्वी हिंसक आंदोलन झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला आहे. शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्याची मागणी करत जेनरेशन Z तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.
सुरुवातीला हा विरोध फी वाढ आणि मूल्यांकन प्रक्रियेच्या विरोधात होता. शांततापूर्ण मोर्चे निघाले होते. परंतु आता हे आंदोलन शहबाज शरीफ सरकारविरोधात बदलले आहे. या आंदोलनातून पाकव्याप्त काश्मीरातील युवा पिढीत असंतोष किती उफाळला आहे हे दिसून येते. या महिन्याच्या सुरुवातीला ही निदर्शने सुरू झाली परंतु ती शांततापूर्ण होती. त्यातच एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने विद्यार्थ्यांच्या गटावर गोळीबार केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आणि त्यात एक विद्यार्थी जखमी झाला.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये मुझफ्फराबादमध्ये एका व्यक्तीने आंदोलकांवर गोळीबार केल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. या व्हिडिओची पडताळणी होऊ शकली नाही. पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र या घटनेने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. संतप्त विद्यार्थ्यांनी टायर जाळले, जाळपोळ केली आणि तोडफोड केली आणि पाकिस्तान सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. ही निदर्शने नेपाळ आणि बांगलादेशमधील Gen Z आंदोलनासारखीच होती.
निदर्शने कशी सुरू झाली?
मुझफ्फराबादमधील एका प्रमुख विद्यापीठात फी वाढ आणि सुधारित सुविधांच्या मागण्यांपासून हे आंदोलन सुरू झाले. जसंजसं आंदोलनाने मोठं स्वरुप घेतले तेव्हा प्रशासनाने विद्यापीठातील सर्व राजकीय कारवायांवर बंदी घातली. जानेवारी २०२४ मध्ये असच एक आंदोलन झाले, जेव्हा दर तीन ते चार महिन्यांनी शुल्काच्या नावाखाली लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून वसूल केले जात आहेत. त्यावेळी पीओकेमधील शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी देखील पगारवाढीच्या मागणीत या आंदोलनात सामील झाले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत?
यावेळी माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी देखील या आंदोलनात सामील झाले आहेत. त्यांचा मुख्य असंतोष या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्यात आलेल्या नवीन ई-मार्किंगच्या डिजिटल मूल्यांकन प्रणालीबद्दल आहे. सहा महिन्यांच्या विलंबानंतर ३० ऑक्टोबर रोजी प्रथम वर्षाच्या इंटरमिजिएट परीक्षेचे निकाल जाहीर झाले, परंतु अनेक विद्यार्थ्यांना खूप कमी गुण मिळाल्याने निकालांवरून संताप व्यक्त झाला. बऱ्याच निकालात न घेतलेल्या विषयांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत असा दावा करण्यात येत आहे.