भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:32 IST2025-07-30T14:30:28+5:302025-07-30T14:32:09+5:30
India-Syria political relations: भारताने पहिल्यांदाच सीरियाचे अंतरिम सरकार असलेल्या अल-शारा सरकारशी औपचारिक चर्चा केली

भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
India-Syria political relations: जगभरात सध्या संघर्षाचे वातावरण सुरू आहे. अनेक देशांचे एकमेकांशी युद्ध किंवा हेवेदावे सुरू आहेत. तशातच भारत सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत पहिल्यांदाच सीरियाच्या अंतरिम सरकारशी औपचारिक चर्चा केली आहे. एकेकाळी अल-कायदाशी संबंधित असलेले अहमद अल-शारा या सरकारचे नेतृत्व करत आहेत. भारताच्या वतीने, परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका (WANA) विभागाचे संचालक सुरेश कुमार यांनी दमास्कसमध्ये सीरियाच्या वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली.
थेट संवादाची पहिलीच वेळ
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बशर अल-असद सरकारच्या पतनानंतर भारताचा तेथील नवीन सरकारशी थेट संवाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या या राजकीय बैठकीचे वृत्त सीरियाची सरकारी वृत्तसंस्था SANA ने दिले आहे. मात्र, भारत सरकारकडून यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
बैठकीचे मुद्दे कुठले?
सुरेश कुमार यांनी सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद अल-शैबानी आणि आरोग्य मंत्री मुसाब अल-अली यांच्याशी विशेष चर्चा केली. चर्चेचा केंद्रबिंदू आरोग्य क्षेत्र, औषध उद्योग आणि वैद्यकीय प्रशिक्षण हे मुद्दे होते. अहवालानुसार, आरोग्य तंत्रज्ञान आणि औषधांच्या क्षेत्रात भारतासोबत मजबूत भागीदारीची आशा सीरियाने व्यक्त केली आहे. याशिवाय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम आणि शिष्यवृत्ती यांसारखे शैक्षणिक कार्यक्रम पुढे नेण्यासाठी एक करार देखील झाला आहे. भारताने सीरियाच्या डॉक्टरांच्या प्रशिक्षणात आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रशिक्षणात मदत करत राहण्याचे आश्वासन दिले.
भारताला फायदा काय?
भारताच्या या पुढाकारामागे सीरियाची सामरिक स्थिती देखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे. हा देश तुर्की, इराक, जॉर्डन, इस्रायल आणि लेबनॉन सारख्या महत्त्वाच्या देशांना लागून आहे. याशिवाय, अमेरिकेने सीरियावरील काही निर्बंध अलिकडेच काढून टाकले आहेत आणि ट्रम्प व अल-शरा बैठक देखील भारताच्या भूमिकेवर प्रभाव टाकू शकते.
भारत-सीरिया संबंध
सीरिया आणि भारत यांच्यातील संबंध नेहमीच मजबूत आहेत. भारताने नेहमीच पॅलेस्टाईन मुद्द्यावर आणि गोलान हाइट्सवरील सीरियाच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. असद राजवटीत, सीरियाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर, विशेषतः काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भारताला पाठिंबा दिला होता. कोविड काळात, भारताने २०२१ मध्ये सीरियाला १० टन औषधे पाठवली आणि २००० टन तांदळाची आपत्कालीन मदतही केली होती.