जगातिक लोकसंख्या वाढीचे शतक आता उलटून गेले आहे. २० व्या शतकात जगाची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली. १९०१ मध्ये, जागतिक लोकसंख्या केवळ १.६ अब्ज एवढी होती, जी आता ८ अब्जांपेक्षाही अधिक झाली आहे. लोकसंख्याशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, लोकसंख्या वाढीचा पिक लवकरच येणार आहे आणि यानंतर लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात होईल. लोकसंख्या कमी होण्याचा हा काळ अनेक देशांसाठी अस्तित्वाच्या लढाईप्रमाणे असेल. काही ठिकाणी वृद्धांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढेल की, तेथे आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. वृद्धांची काळजी घेण्यासाठी तरुणांची संख्या कमी असेल.
वॉशिंग्टनस्थित इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) नुसार, या शतकाच्या मध्यापर्यंत, अर्थात २०५० पर्यंत, जगातील ७५ टक्के देशांमध्ये जन्मदर, हा रिप्लेसमेंट रेषेच्याही खाली येईल. अर्थात, जोडप्यांना दोनपेक्षा कमी मुले असतील. आजही, अनेक देशांमध्ये, अशा कुटुंबांची संख्या वाढताना दिसत आहे, ज्यांना अजिबात मुले नाहीत अथवा केवळ एकच मूलगा आहे.
आयएचएमईच्या अंदाजानुसार, २०५० पर्यंत ७५ टक्के देशांमध्ये जन्मदर पिप्लेसमेंट पातळीपेक्षा कमी असेल. तर २१०० मध्ये हा आकडा ९७ टक्के असेल. एवढेच नाही तर, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आजपासून ७५ वर्षांनीही नायजर, टोंगा, सोमालिया आणि ताजिकिस्तान सारख्या देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा अधिक असेल.
या अभ्यासात जगभरातील सरकारांना लोकसंख्येत अचानकपणे येणारी घट रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जलद लोकसंख्या घटीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. मात्र, याच काळात म्हणजे, २१०० पर्यंत जगातील निम्मी मुले आफ्रिकन देशांमध्ये जन्माला येतील. अर्थात जगातील प्रत्येक दुसरे मूल हे आफ्रिकन देशात जन्माला येईल. त्याच वेळी, जपान, दक्षिण कोरिया आणि रशियासारख्या देशांना स्थलांतरितांसाठी त्यांचे दरवाजे खुले करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. यामुळे तेथे लोकसंख्या संतुलन राखले जाईल. रशियामध्ये, लोकसंख्येचे संकट एवढे वाढले आहे की, त्यांना इतर देशांतील तरुणांना आकर्षित करून आपल्या सैन्यात भरती करावे लागत आहे.