हिंगोलीत नवीन १२०४ घरकुलांची कामे होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:33+5:302021-08-01T04:27:33+5:30
हिंगोली : येथील नगरपालिकेच्या वतीने नवीन १२०४ घरकुलांची कामे सुरू करण्यात येणार असून यापैकी ६०९ घरकुलांचे कार्यारंभ आदेशही देण्यात ...
![Work on 1204 new houses will start in Hingoli | हिंगोलीत नवीन १२०४ घरकुलांची कामे होणार सुरू Work on 1204 new houses will start in Hingoli | हिंगोलीत नवीन १२०४ घरकुलांची कामे होणार सुरू](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/hingoli-marathi-default-image_202012530687.jpg)
हिंगोलीत नवीन १२०४ घरकुलांची कामे होणार सुरू
हिंगोली : येथील नगरपालिकेच्या वतीने नवीन १२०४ घरकुलांची कामे सुरू करण्यात येणार असून यापैकी ६०९ घरकुलांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.
हिंगोली नगरपालिकेने यापूर्वी १०९८ घरकुलांना मंजुरी दिली होती. प्रतिलाभार्थी २.५ लाखांचे अनुदान यात दिले जाते. यामध्ये राज्याचा एक लाख तर केंद्र शासनाचा दीड लाखांचा वाटा आहे. राज्य शासनाचा वाटा पूर्णपणे मिळाला आहे. मात्र केंद्र शासनाचे ३.६८ कोटीच मिळाले होते. तर १४.६६ कोटी रुपये अजूनही मिळालेले नाहीत. त्यामुळे यातील अनेक लाभार्थ्यांचे काम आता अंतिम टप्प्यात असूनही निधीअभावी ठप्प पडले आहे. मुळात निधी नसल्याने ८३० जणांनाच कार्यारंभ आदेश दिला होता. यापैकी ६०० कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामांसाठी निधीचा प्रश्न आहे.
आता नव्याने तीन डीपीआर मंजूर झाले आहेत. यात ४२१, १८८ व ५९७ घरकुलांचे हे तीन विकास आराखडे आहेत. या १२०४ घरकुलांचे कार्यारंभ आदेश देण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत जवळपास ६०९ जणांना काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या घरकुलांसाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचे ११.५६ कोटी रुपये अदा केले आहेत. मात्र केंद्र शासनाच्या वाट्याचे १८ कोटी रुपये वेळेत न आल्यास या कामांनाही ब्रेक लागण्याची भीती आहे. सध्या ही कामे सुरू करण्यात येत असल्याचे शहरातील विविध भागात दिसून येत आहे. कार्यारंभ आदेश दिलेल्या लाभार्थ्यांना मार्क आऊट देण्यात येत आहेत. त्यानंतर लगेच काहीजण कामालाही सुरुवात करीत आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेत केेंद्राचाच अडसर
या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना आहे. मात्र केंद्र शासनाकडूनच वेळेत निधी येत नाही. त्याचा परिणाम म्हणून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ येत आहे. इतर अनेक आश्वासनाप्रमाणे हा विषय काही निवडणूक जुमला म्हणण्यासारखी नाही. मात्र राज्य शासनाने निधी दिला असल्याने गाेरगरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकारणाऱ्या या उपक्रमाला केंद्राने ही वेळेत निधी देणे गरजेचे आहे. पंतप्रधानांच्या नावाने असलेल्या योजनेचे होणारे हे हाल लाभार्थ्यांच्या संतापात भर घालणारे ठरत आहेत.