परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दाखल उमेदवारी अर्ज परत घेण्याचा १० मार्च हा शेवटचा दिवस आहे. सद्यस्थितीत ३ उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्यास आता फक्त ४ दिवसांचा कालावधी राहिला आहे. या अनुषंगाने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. शुक्रवारी प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्थाच्या कळमनुरी गटातून यशोदाबाई माधवराव चव्हाण यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज परत घेतला आहे. त्यामुळे या गटात आता बॅंकेचे विद्यमान संचालक सुरेश रावसाहेब पतंगे-वडगावकर आणि माजी खा. शिवाजी माने यांचा अर्ज राहिला आहे. पतंगे हे खा. राजीव सातव यांचे कट्टर समर्थक आहेत. तर माजी खा. माने हे खा. सातव यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता सरळ लढत होणार आहे.
कळमनुरीतून यशोदाबाई चव्हाण यांचा अर्ज मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:29 AM