दुभाजक बसविण्याची मागणी
कळमनुरी : शहरातील डॉ. शंकरराव सातव महाविद्यालय ते बसस्थानक दरम्यान वाहनांची नेहमी वर्दळ असते. अनेक वेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावर दुभाजक बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
सौरदिवे बनले शोभेची वस्तू
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने अनेक ग्रामपंचायतींमध्ये सौरदिवे बसविण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच सौर दिवे बंद पडत आहेत. बॅटऱ्याही चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा कोणताही लाभ गावकऱ्यांना होत नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
मजुरांची मोठ्या शहरांकडे धाव
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर गावाकडे परत आले होते. त्यानंतर शासनाने काही अटी शिथिल केल्या असून प्रवासी वाहने धावत आहेत. त्यामुळे गावाकडे आलेले मजूर पुन्हा कामासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागातून पहावयास मिळत आहे.
अवैध वृक्षतोड वाढली
कळमनुरी : तालुक्यात काही दिवसांपासून अवैध वृक्षतोड वाढली आहे. चांगली झाडेही तोडली जात आहेत. एकीकडे वृक्षारोपण करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे वृक्षतोड होत असल्याने नागरिकातून रोष व्यक्त केला जात आहे.