"हवामान नडलं, आता युद्ध आडवं आलं!"; हिंगोलीच्या हळदीला अपेक्षित भाव मिळेना,शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:20 IST2026-03-11T16:15:03+5:302026-03-11T16:20:02+5:30
युद्धामुळे हिंगोलीत हळदीच्या भावात घसरण

"हवामान नडलं, आता युद्ध आडवं आलं!"; हिंगोलीच्या हळदीला अपेक्षित भाव मिळेना,शेतकरी चिंतेत
हिंगोली : मराठवाडा आणि विदर्भातील हळद खरेदी- विक्रीचे केंद्र असलेल्या हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. मात्र, हळदीच्या भाववाढीवर आखाती देशातील युद्धाचे सावट दिसून येत आहे. सद्यस्थितीला भाव कोसळलेले असून, युद्धविराम झाला नाही तर हे भाव आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने व्यापारी सावध भूमिका घेत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांत सध्या चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.
येथील मार्केट यार्डात दरवर्षी हंगामाच्या काळात ५ ते ७ हजार क्विंटल हळदीची आवक होते. सध्या हंगामाची सुरूवात असल्याने दिवसाला एक ते दीड हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत आहे. यामध्ये नवीन हळदीसोबतच काही प्रमाणात जुन्या हळदीचाही समावेश आहे. या हळदीला सरासरी १३,५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.
हळदीच्या या भावघसरणीमागे केवळ स्थानिक कारणे नसून जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम असल्याचे दिसत आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे. त्यामुळे भविष्यात मागणी घटण्याची शक्यता असल्याने व्यापारी आणि खरेदीदार सध्या सावध भूमिका घेत आहेत. येणाऱ्या काळात युद्धविराम झाला नाही तर आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि मागणी विस्कळीत होऊन हळदीचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घामाचा योग्य दाम मिळावा
निसर्गाच्या लहरीपणातून वाचवून पिकवलेल्या सोन्यासारख्या हळदीला आता युद्धाच्या झळा सोसाव्या लागल्या तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. आधीच कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा.
- नंदू कऱ्हाळे, शेतकरी
हंगाम आला की भाव पडतात
शेतमालाचा कोणताही हंगाम सुरू झाला की भाव पडतात, हा अनुभव नेहमीचाच झाला आहे. अतिवृष्टीच्या माऱ्यात सोयाबीन, कापूस, तुरीला फटका बसला. आता हळदीवर मदार आहे. परंतु, योग्य भावाची प्रतीक्षा आहे.
- रामराव थोरात, शेतकरी