उन्हाळी भुईमूग पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:59+5:302021-02-14T04:27:59+5:30
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या अंदाजनुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ व ढगाळ राहील. १३ ते १७ फेब्रुवारी या ...
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या अंदाजनुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ व ढगाळ राहील. १३ ते १७ फेब्रुवारी या पाच दिवसांत किमान तापमान २ ते ४ अंशसेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. भुईमूग पेरणीपूर्वी बियाणास थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच रबी ज्वारी पीक फुलोरा ते दाणे भरणे अवस्थेत असताना उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करावे. ज्वारी पिकावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदरांचे प्रमाण दिसून आल्यास झिंक फॉस्फाईड, गुळ, गव्हाचा भरडा, व थोडेसे गोडतेल मिसळून मिश्रण उंदरांच्या बिळात टाकून बिळे बंद करावीत. दुसरीकडे गव्हावर तांबेरा रोग पडल्यास झायनेब किंवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
केळीच्या घडांना झाकून ठेवावे
केळी बागेत फळाची प्रत चांगली राहण्यासाठी घडांना झाकून ठेवावे. केळीचे प्रतिझाड ५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश देवून केळींना पाणी वेळेवर द्यावे. आंब्यामध्ये मोहर फुलण्याच्या अवस्थेमध्ये शक्यतो फवारणी करणे टाळावे. जेणेकरुन परागीकरणावर परिणाम होणार नाही. गरज पडल्यास तुडतुड्यांच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क अथवा थायमिथाक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे. भुरी व करपा रोगाच्या द्राक्षांच्या बागेत वेळेवर पाणी द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.