जि.प.त आधीच प्रभारी राज; अनेकांना बदल्यांचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:26+5:302021-08-01T04:27:26+5:30
जिल्हा परिषदेत मागील अनेक वर्षांपासून पंचायत, समाजकल्याण, पाणीपुरवठा, मग्रारोहयो, महिला व बालकल्याण या विभागांना कोणी अधिकारी मिळाला नाही. त्यातच ...
जिल्हा परिषदेत मागील अनेक वर्षांपासून पंचायत, समाजकल्याण, पाणीपुरवठा, मग्रारोहयो, महिला व बालकल्याण या विभागांना कोणी अधिकारी मिळाला नाही. त्यातच नव्याने वित्त विभाग, पशुसंवर्धन व बांधकाम विभागाची भर पडली, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाही प्रभारावरच सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील हे प्रभारी राज संपविण्यासाठी कोणी प्रयत्न करीत आहे की नाही? हे कळायला मार्ग नाही. प्रभारी कारभारात दोन दोन विभागांच्या गाडा हाकताना काही अधिकारी समतोल साधत असले तरीही काहींचे गणित बिघडत आहे. त्याचा फटका सामान्यांना नाहक जि.प.च्या फेऱ्या मारून सोसावा लागत आहे. एवढ्या सगळ्या विभागांना अधिकारी नसले तरीही ते आणण्यासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही. शिक्षण विभागाला शिक्षणाधिकारी असले तरीही उपशिक्षणाधिकाऱ्यांचा पत्ता नाही.
आता जि.प.तील डी.आर. माळी, ए.एल.बोंद्रे या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी पी.बी.पावसे, संदीप सोनटक्के यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. शिवाय मागील काही दिवसांपासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार हेही नाराज असल्याने बदली झाल्यास त्यांची येथून जाण्याची इच्छा दिसत आहे, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे यांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही पदे रिक्त झाली, तर संपूर्ण जिल्हा परिषदच प्रभारावर चालविण्याची वेळ येते की काय? असा प्रश्न आहे.