रिॲलिटी चेक
हिंगोली : कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जात आहेत. शालेय विद्यार्थीही नियमित मास्क वापरत आहेत. मात्र त्यांचे पालक मास्क वापरत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. घराबाहेर जाताना आमच्या आई-वडिलांनी मास्क वापरावे, यासाठी विद्यार्थी त्यांना तगादा लावत आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले आहे तसेच कोरोना नियमांच्या त्रिसूत्रीचे पालन करावे, यासाठी जनजागृती केली जाते. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत मास्क वापरत असले तरी त्यांचे आई-वडील मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. ज्यांच्या खांद्यावर संसाराचा भार आहे, तेच मास्क वापरत नसल्याने लहान बालकांमध्येही धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शालेय विद्यार्थ्यांना पत्र पाठवून आई-वडिलांना मास्क वापरण्यासाठी आग्रह धरावा, असे आवाहनही केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी आता आई-वडील घराबाहेर जात असताना मास्क वापरण्याची आठवण करून देत आहेत. आईबाबा, स्वत:साठी, आमच्यासाठी मास्क वापरा, असे भावनिक आवाहनही विद्यार्थी करत आहेत.
स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबांचीही काळजी घ्या !
- प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
- आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटाझर वापरले का? हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
१) पुन्हा कोरोनाची भीती वाढल्याने पूर्वीप्रमाणेच नियम पाळणे आवश्यक झाले आहे. विद्यार्थी शाळेत सर्व नियम पाळत आहेत. परंतु, आई-वडील, सर्व ज्येष्ठ मंडळींनीही नियम पाळावे, यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.
- सौरभ अंबादास खराटे, इयत्ता नववी काैठा, ता. वसमत
२) आम्ही सर्व लहान मुले सामाजिक नियमांचे पालन करीत आहोत. घराबाहेर जाताना मास्क वापरावे, यासाठी आई-वडिलांना मास्क वापरण्यासाठी तगादा लावत आहे. तसेच आपणही घराबाहेर जाताना मास्क वापरावे.
- रुद्राणी स्वामी, इयत्ता पाचवी रा. काैठा, ता. वसमत
३) ग्रामीण भागात बहुतेक जण कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माझे आई- वडीलही मास्क वापरत नव्हते. शाळेत मास्क वापरण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे माझ्या आई-वडिलांनाही मास्क वापरण्यासाठी प्रेरित करीत आहोत.
- मु.बसीर सगीर बागवान, रा. शिरडशहापूर, ता. औंढा नागनाथ
४) आम्ही शाळेत मास्क वापरत आहोत. मात्र माझे आई-वडील मास्क वापरत नव्हते. त्यांना कोरोना आजाराचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यामुळे आता तेही मास्क वापरत आहेत.
- अरबी ना. सय्यद अर्शद, वर्ग रा. शिरडशहापूर, ता. औंढा नागनाथ
५) काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आई-वडिलांसह घरच्यांना मास्क वापरण्याचे सांगत आहे. तसेच घरचे बाहेर जात असताना मास्क लावण्याचे आठवणीने सांगत आहे.
- विराज शिवाजी देशमुख, इयत्ता तिसरी, रा.सवना, ता. सेनगाव
६) काेराेनाचा पुन्हा संसर्ग वाढत असल्याने बहुतांश जण बिनधास्त फिरत आहेत. यामुळे इतरांनाही काेेराेना संसर्गाचा धाेका निर्माण हाेऊ शकताे. यामुळे माझ्या आई-वडिलांसह घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे सांगत आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी सामाजिक नियमांचे पालन करावे.
शर्वरी प्रभाकर कावरखे, इयत्ता सहावी, रा. गाेरेगाव
अधिकाऱ्याची प्रतिक्रिया
जिल्हाभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपली, आपल्या मुलांची, कुटुंबीयांची काळजी घ्यावी. प्रत्येकाने हात स्वच्छ धुवावेत, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स ठेवावे. काही शंका वाटल्यास रुग्णालयात जाऊन आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी,