आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत करिअर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:29 AM2021-05-14T04:29:28+5:302021-05-14T04:29:28+5:30
हिंगोली : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे मोफत करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन ...
हिंगोली : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे मोफत करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यात यासाठी तीन शिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली असून, त्यांच्याशी संपर्क साधल्यास मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
दहावी, बारावीचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. या काळात त्यांच्यात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असते. यातूनच अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व कालावधीत तसेच परीक्षा दरम्यान, परीक्षेनंतर व निकालानंतर समुपदेशन करण्याचा, त्यांना करिअर मार्गदर्शन करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. यातून विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यात समुपदेश व मार्गदर्शक म्हणून तीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात संजय गंगाराम खिल्लारे (जि. प. हायस्कूल, येहळेगाव सो.), मोहन केशवराव पाटील (नागनाथ विद्यालय, औंढा), दिलीप रामेश्वर चव्हाण (सीजी. मुंदडा, हायस्कूल सिरसम बु.) यांचा समावेश आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज वाटल्यास, तसेच करिअर मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास त्यांनी या शिक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.