जवळा बाजार : मराठा आरक्षण रद्द केल्याने समाज बांधवातून तीव्र असंताेष आहे. सकल मराठा बांधवांच्यावतीने आजरसाेंडा शिवारातील शेत बांधावरून राज्य व केंद्र सरकारचा आज सकाळी ११ वाजता जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा शिवारात ७ मे रोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाविराेधात येथील शेत बांधावरून केंद्र शासन व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी आंदोलकांनी काळे मास्क लावून दोन्ही सरकार विरोधात जोरदार घाेषणाबाजी केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी नव्याने लढाईची सुरुवात शेतीच्या बांधावरून करण्यात आली आहे. पुन्हा एकदा नव्या जोमाने अखंडित लढाई सुरू करणार असल्याचे समाज बांधवांच्यावतीने सांगण्यात आले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शेती बांधावरुन ते दिल्लीच्या तख्तापर्यत ही लढाई सुरूच राहील, असा निर्धार सर्वांनी याप्रसंगी व्यक्त केला.