'सरकारला सद्बुद्धी मिळो'; सोयाबीन दरवाढीसाठी बनीमीसमोर महाआरती
By संदीप शिंदे | Updated: October 19, 2023 18:47 IST2023-10-19T18:47:24+5:302023-10-19T18:47:47+5:30
पानचिंचोलीत काॅग्रेसचे आंदोलन

'सरकारला सद्बुद्धी मिळो'; सोयाबीन दरवाढीसाठी बनीमीसमोर महाआरती
निलंगा : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हणून सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पादनासाठी केलेला खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. आंदोलने, मोर्चे काढूनही सरकारला जाग येत नसल्याने सोयाबीनचे दर वाढविण्यासाठी सद्बुद्धी यावी, यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पानचिंचोली येथे सोयाबीनच्या बनीमीसमोर कलश पूजा मांडून विधिवत पुजा करुन गुरुवारी महाआरती करण्यात आली.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस कमी झाल्याने आणि पिक फुलोऱ्यात असताना मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन उत्पन्नात मोठी घट झाली. एकरी दहा क्विंटल निघणारे सोयाबीन दोन क्विंटलच निघत आहे. २२ ते २५ हजार रुपये एकरी उत्पादन खर्च लागत आहे. त्या मानाने उत्पादनही होत नाही. त्यातच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. नवीन सोयाबीन बाजारात येताच ५ हजारांवरून ४२०० रुपयांवर दर घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट सोयाबीन बनमीसमोर पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचा फोटो लावून आम्ही शेतकरी अडचणीत आहोत आमच्या सोयाबीनला दर वाढवून द्यावा अशी मागणी करीत विधीवत पुजा करुन महाआरती केली.
यावेळी सुधाकर पाटील, ॲड. नारायणराव सोमवंशी, गंगाधर चव्हाण, दिनकर पाटील , विठ्ठल पाटील, प्रमोद मरूरे, बालाजी भुरे,श्रीकांत साळुंके, मदन बिरादार, मुजीब सौदागर, भगवान पाटील, बब्रुवान जाधव, दिलीप पाटील, भगवान भांगे, साहेबराव पाटील, काकासाहेब पाटील, दिनकर गवळी, नागु जगदाळे, बालाजी काळे, माधव दिवे, उमाकांत कुलकर्णी, मधुकर दिवे, दस्तगीर सय्यद, पाशु सय्यद, मुस्तफा पटेल, ज्ञानोबा धाबळे, ज्ञानबा जाधव, जलील शेख, शुभम जाधव, सिद्धू जाधव, अर्जुन कदम, बालाजी बिराजदार, दीपक दिवे, गुरुनाथ जाधव, दिलीप काळे, पिंटू काळे आदी उपस्थित होते.