हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १ वाजता उघडकीस आली.
हरिदास परसराम खिल्लारे(६०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर बँकेचे अडीच लाख रुपयांचे कर्ज आहे. मागील वर्षी पाऊस बरोबर न झाल्याने शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यातच बँकही कर्ज देत नसल्याने व शेतातील उत्पादनात घट झाल्याने बँकेचे कर्ज फेडायचे कसे? ही चिंता त्यांना नेहमीच सतावत होती.
आज सकाळी १० वाजता पेरणी झालेल्या शेताची पाहणी करून येतो, असे म्हणून ते शेतामध्ये गेले होते. ते उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शेतात शोध घेतला. तर ते शेतातील गोठ्यात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. या प्रकरणी मयताचा मुलगा शंकर हरिदास खिल्लारे यांच्या खबरीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.