सावधान! हिंगोलीत पिसाळलेल्या कोल्ह्याची दहशत; गायीवर हल्ला, नागरिकांमध्ये दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:51 IST2026-03-31T11:48:44+5:302026-03-31T11:51:26+5:30
अंबिका टॉकीज ते जलेश्वर तलाव परिसरात कोल्ह्याचा धुमाकूळ; वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी.

सावधान! हिंगोलीत पिसाळलेल्या कोल्ह्याची दहशत; गायीवर हल्ला, नागरिकांमध्ये दहशत
हिंगोली: हिंगोली शहरात गेल्या काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकूळ घातला असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या आक्रमक कोल्ह्याने एका गायीवर हल्ला करून तिचा लचका तोडला असून, आता तो थेट माणसांच्या अंगावर धावून जात आहे. शहराच्या मुख्य वर्दळीच्या भागात कोल्ह्याचा वावर आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेषतः शहरातील प्रसिद्ध जलेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि अंबिका टॉकीज परिसरात या कोल्ह्याचा वावर सर्वाधिक दिसून येत आहे.
गायीवर हल्ला अन् नागरिकांमध्ये पळापळ
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा कोल्हा अत्यंत पिसाळलेला असून तो रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या मागे धावत आहे. मंगळवारी सकाळी एका गायीवर या कोल्ह्याने हल्ला केला, ज्यामध्ये गाय गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर तलाव कट्टा परिसरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी आता तिकडे जाणे टाळले आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी हा रस्ता सध्या जीवघेणा ठरत आहे.
वन विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कोल्हा अद्यापही याच परिसरात दबा धरून बसलेला आहे. भरवस्तीत वन्यप्राण्याचा अशा प्रकारे वावर असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. "वन विभागाने तातडीने या पिसाळलेल्या कोल्ह्याचा बंदोबस्त करावा आणि त्याला जेरबंद करावे," अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी लावून धरली आहे.