नगरपालिकेच्या १४५ घरकुलांच्या विशेष प्रकल्पास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:50 IST2019-11-26T18:48:30+5:302019-11-26T18:50:26+5:30
या योजनेत लाभार्थ्यांना ३00 स्क्वेअर फुटांपर्यंतचे बांधकाम करता येते. त्यासाठी अडीच लाखांचे अनुदान शासन देते.

नगरपालिकेच्या १४५ घरकुलांच्या विशेष प्रकल्पास मंजुरी
हिंगोली : शहरात प्रधानमंत्री आवास योजनेत ९५९ घरकुलांचा प्रकल्प आधीच मंजूर असताना आता अपंग, विधवा, सफाई कामगार अशा एकूण १३९ जणांसाठी घरकुलांचा विशेष प्रकल्प मंजूर झाला आहे. लवकरच ही कामेही सुरू केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.
हिंगोली नगरपालिकेच्या हद्दीत मागील वर्षीपासून प्रधानमंत्री आवास योजनेतील कामे सुरू झाली आहेत. हिंगोलीसाठी प्रधानमंत्री घरकुलमध्ये वेगवेगळे तीन विकास आराखडे मंजूर झाले होते. यात ६0९, १५0 व २00 घरकुलांचे हे आराखडे होते. याची एकूण संख्या ९५९ एवढी आहे. तर यापैकी ८१२ घरकुलांचे काम सुरू करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेत लाभार्थ्यांना ३00 स्क्वेअर फुटांपर्यंतचे बांधकाम करता येते. त्यासाठी अडीच लाखांचे अनुदान शासन देते. यापेक्षा जास्त बांधकाम होत असल्यास लाभार्थ्यांना पदरमोड करावी लागते. यामध्ये लाभार्थ्यांच्या गरजेनुरुप सोय होईल, अशी व्यवस्था केली आहे. या योजनेत ५00 कामे सुरू असून १५६ घरकुलांचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
सध्या जी कामे सुरू झाली त्यामध्ये ४६५ घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. यापैकी ३४५ घरकुलांचे काम पुढच्या टप्प्यात गेल्याने त्यांना दुसरा हप्ताही वितरित केला होता. तर २१३ जणांना तिसरा हप्ता वितरित केला आहे. त्यामुळे ही कामे अंतिम टप्प्यात असून ही कामे पूर्ण झाल्यास एकूण कामे पूर्ण होत असल्याची संख्या साडेतीनशेच्या पुढे जाणार आहे. मध्यंतरी या योजनेत निधीची अडचण असल्याने लाभार्थ्यांची ओरड होती. त्यामुळे नगरपालिका प्रशासनही हैराण होते. न.प. पदाधिकाºयांना भेटण्यासाठी अनेकदा शिष्टमंडळे येत होती. नगरसेवकांसाठीही ही बाब डोकेदुखी बनली होती. त्यामुळे प्रशासनही अडचणीत सापडले होते. आता निधी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरणाचे कामही सुरू आहे. त्याचबरोबर ज्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरित झाला, अशा लाभार्थ्यांनी आपल्या कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे येत्या मार्च एण्डपर्यंत जास्तीत-जास्त कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
आचारसंहितेत फटका; कामे लांबली
मागील वर्षभरात दोनदा आचारसंहितेमुळे लाभार्थ्यांना मंजूर घरकुलाच्या निधीसाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती. ज्यांना दुसरा किंवा तिसरा हप्ता मिळायचा होता, अशांची कमी मात्र पहिलाच हप्ता मिळण्यासाठी दोनदा आचारसंहितेच्या कचाट्यात लाभार्थी सापडले होती. या आचारसंहितेच्या काळातील निधी वितरणाच्या बंधनामुळे कामे लांबली आहेत. अनेकांनी घराचे बांधकाम होणार असल्याने पूर्वीचा निवारा पाडल्याने अशांना तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर अनेकांनी भाड्याचे घर घेतल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागला. यापुढे या कामात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. लाभार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर वेळेत निधी मिळेल. उर्वरित लाभार्थ्यांनीही कामे सुरू करावी. ज्यांना आदेश मिळाले त्या सर्वांनी घरकुलाचे काम सुरू करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.