जिल्ह्यातील १५३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:27 AM2021-01-21T04:27:29+5:302021-01-21T04:27:29+5:30
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, १५३ ग्रामपंचायती निर्विवाद बहुमतासह ताब्यात ...
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, १५३ ग्रामपंचायती निर्विवाद बहुमतासह ताब्यात घेतल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली आहे. त्यापैकी ७३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडण्यात आले असून, उर्वरित ४२२ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी खा. राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने या निवडणुका लढविल्या. काँग्रेसने स्वतंत्रपणे पॅनल उभे केले होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधकांवर टीका करण्याऐवजी विकासाचे मुद्दे घेऊनच काँग्रेसने प्रचार केला. गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी विकास कामांच्या जोरावर निवडणुकीचा प्रचार चालविला होता. गावकऱ्यांचे प्रश्न समजून घेत, त्यांची कुठल्याही परिस्थितीत सोडवणूक केली जाईल, असे आश्वासन देत निवडणूक लढविली. जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकून तब्बल १५३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात दिल्या आहेत. आखाडा बाळापूर, दांडेगाव, नरसी नामदेव, येळेगाव सोळंके, शेवाळा, पिंपळदरी अशा मोठ्या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, याशिवाय जिल्ह्यात १,३०५ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. विकासाच्या मुद्द्यावरच जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास टाकून मोठ्या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात दिल्या आहेत. या ग्रामपंचायतीमधून पालकमंत्री गायकवाड, खा.राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे करून गावकऱ्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही संजय बोंढारे यांनी सांगितले.