तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:12 IST2025-06-29T12:11:49+5:302025-06-29T12:12:12+5:30
उतारवयात म्हणजे वयाच्या साठीनंतर होणारे हृदयाचे विकार सध्या ३० ते ४० वयोगटांतील तरुणांना जडलेले दिसत आहेत. त्यामुळे हृदयविकार तज्ज्ञांनी ३० ते ३५ वयात हृदयाची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
मुंबई : ‘कांटा लगा’फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन प्रथम दर्शनी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तरुण वयातील हृदयविकाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उतारवयात म्हणजे वयाच्या साठीनंतर होणारे हृदयाचे विकार सध्या ३० ते ४० वयोगटांतील तरुणांना जडलेले दिसत आहेत. त्यामुळे हृदयविकार तज्ज्ञांनी ३० ते ३५ वयात हृदयाची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे तरुणांच्या खाण्या-पाण्यापासूनच्या सर्वच सवयी बदलल्या आहेत. दररोज रात्री उशिरापर्यंत जागरण, झोप पूर्ण न होणे, कौटुंबिक आणि व्यावसायिक ताणतणाव ही काही प्रमुख कारणे हृदयाच्या आरोग्याला बाधा पोहोचवत आहेत, असे हृदयरोग तज्ज्ञ सांगत आहेत.
अनेक वर्षांपासून मुंबईत होणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयरोग ‘नंबर वन’वर आहे. अनेक हृदयविकार तज्ज्ञांच्या ओपीडीमध्ये तरुण रुग्ण उपचारासाठी येताना दिसत आहेत.
हृदय रोगाची लक्षणे
छातीत कळ आल्यास ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करू नका.
छातीत दुखणे.
श्वास घेण्यास त्रास होणे.
थोडा वेळ चालले, तरी दम लागणे, घाम येणे.
हृदयाचे ठोके वाढणे.
उपाय असे...
हृदयरोगाला प्रतिबंध करणे प्रत्येकाच्या हातात आहे. धूम्रपान, अवेळी जेवण, विशेषत: प्रक्रिया केलेले पदार्थ, जंकफूड, तेलकट आणि फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे ‘ट्रायग्लिसराइड्स’ची पातळी वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो. चांगल्या आहाराने हे टाळणे शक्य आहे. आठवड्याला १५० मिनिटे चालले पाहिजे. ज्यांना व्यायाम करायला जमत नाही त्यांनी योगासने करावीत.
व्हिसेरा केला जतन
शेफाली जरीवालाच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेला होता. तेथे व्हिसेरा जतन करून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
औषधांचा परिणाम?
जरीवाला हिच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूबाबत दिवसभरात विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यात वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणून ती अँटी एजिंगची (लवकर वृद्धत्व येऊ नये) औषधे घेत असल्याचे सांगण्यात येत होते. त्याचा परिणाम झाला असण्याची शक्यता असावी, अशी जोरदार चर्चा होती. मात्र याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
आमच्या ओपीडीमध्ये दिवसाला हृदयविकाराच्या तक्रारीचे दोन ते तीन तरुण येतात. अनेक जणांना अँजिओग्राफीनंतर अँजिओप्लास्टीची गरज असल्याचे दिसून आले आहे. तर, काहींची थेट बायपास शस्त्रक्रिया करावी लागत आहे. त्यामुळे ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांनी हृदय तपासणी करून घ्यावी. अनेक तरुण शरीरयष्टी आकर्षक राहावी म्हणून वैद्यकीय सल्ल्याशिवाय अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, सप्लिमेंट्स घेता. त्यामुळे देखील हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
डॉ. अजय चौरासिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय