लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात खाज, डेंड्रफ टिनिया (रिंगवर्म), बुरशीजन्य दाणे, ॲथलिट्स फूट यासारखे विकार सर्रास आढळून येतात. या विकारांमागे दमट हवामान आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष ही काही कारणे आहेत. पावसात पडणे, घसरणे किंवा सतत ओलसर कपडे वापरण्याने त्वचेवर होणाऱ्या किरकोळ जखमादेखील बुरशीजन्य संसर्गाचे माध्यम बनतात. या जखमांकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संसर्ग शरीरभर पसरू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.
त्वचारोगांपासून बचाव कसा कराल? खाज येत असल्यास स्वतःहून औषधे न वापरता डॉक्टरांचा सल्ला घ्या.पावसात भिजल्यानंतर त्वचा कोरडी पुसून घ्या.शक्यतो कॉटनचे आणि सैलसर कपडे वापरा.ओलसर कपडे किंवा बूट जास्त काळ वापरणे टाळा.
पावसाळ्यात त्वचाविकारांत वाढ होते. त्वचेच्या विकारांवर वेळेत उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या काळात ३० ते ४० टक्क्यांनी त्वचाविकाराचे रुग्ण वाढत असतात. रुग्णाच्या आजारांची लक्षणे बघून त्यांवर औषधोपचार करण्यात येत असतात. त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला जेजे रुग्णालयातील त्वचारोग विभाग, सहयोगी प्राध्यापक डॉ. रत्नाकर कामत यांनी दिला.
लहान मुलांची विशेष काळजी आवश्यकलहान मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे त्यांना त्वचाविकारांची शक्यता अधिक असते. त्यामुळे भिजल्यानंतर कपडे त्वरित बदलणे, त्वचा कोरडी ठेवणे आणि माती किंवा चिखलात खेळताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच घरी आल्यावर अंग स्वच्छ करणे गरजेचे आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार महत्त्वाचेत्वचेवरील कोणताही त्रास काही दिवसांपेक्षा अधिक काळ टिकल्यास किंवा पसरत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा बाजारात सहज मिळणाऱ्या मलमांमुळे त्रास तात्पुरता कमी होतो; पण मुळातील संसर्ग वाढतच राहतो. अनेकदा स्टेरॉइड असलेले मलम केव्हा आणि कुठे वापरावेत, हे अनेकांना कळत नाही.