जीर्ण वर्गखोल्यांमध्ये शाळा भरवायची कशी तुम्हीच सांगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST2021-08-12T05:00:00+5:302021-08-12T05:00:25+5:30
विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी जानेवारी २०२० ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदन देण्यात आले, परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. जीर्ण झालेल्या शाळेच्या खोल्या पडून विद्यार्थ्यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जीर्ण वर्गखोल्यांमध्ये शाळा भरवायची कशी तुम्हीच सांगा!
चरण चेटुले
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील ४ किमी अंतरावर असलेल्या ग्राम करांडली येेथे जिल्हा परिषदेची १ ते ४ पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे बांधकाम विटामाती व कवेलूचे असल्यामुळे जुनी झाल्याने भिंतीना भेगा पडून पावसाळ्याच्या दिवसात खोल्यांमध्ये पाणी गळून चार वर्गाची बैठक व्यवस्था दोन खोल्यांमध्ये करुन शैक्षणिक कार्य करण्यात येतात. त्यामुळे जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमध्ये बसवून शिकवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी जानेवारी २०२० ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदन देण्यात आले, परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. जीर्ण झालेल्या शाळेच्या खोल्या पडून विद्यार्थ्यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन नवीन शाळेच्या खोल्या बांधण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश शहारे यांनी केली आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारती सुंदर बोलक्या आणि डिजिटल करण्याच्या नादात शासन जुन्या इमारत खोल्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करुन नवीन बांधकाम करण्याचा विसर पडल्याचे ग्राम करांडली येथील प्राथमिक शाळेच्या खोल्यांकडे पाहिल्यानंतर येत आहे.
शाळा भरविण्याची समस्या
- अलीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने १७ ऑगस्ट २०२१ पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुनी मोरगाव तालु्क्यातील करांडली येथील १ ते ४ पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून शालेय इमारत जुनी झाल्यामुळे जीर्ण होऊन खोल्यांच्या भितींना भेगा पडून पावसाळ्याच्या दिवसात कवेलूमधून पाणी गळत असते. शाळा सुरु झाल्यास या शाळेत मुलांना शाळा पडण्याच्या भीतीमुळे पालक शाळेत पाठवतात किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांच्या पत्राची दखल नाही
- गेल्यावर्षी ४ वर्गाची विद्यार्थी संख्या दोन खोल्यांमध्ये बैठक व्यवस्था करुन विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना अध्यापन कार्य पार पाडावे लागत असे. विद्यार्थ्यांचे भविष्य व हित लक्षात घेऊन नवीन खोल्यांच्या बांधकामाची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदनाद्वारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे नागरिकांनी अनेकदा मागणी केली आहे, परंतु प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे नवीन खोल्या बांधकामाची दखल घेतली नाही. कदाचित जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असती तर कोरोनामुळे बंद असलेल्या कालावधीत शाळेच्या खोल्यांचे बांधकाम करता आले असते, परंतु प्रशासनाची शिक्षण क्षेत्रावर असलेली अनास्था कारणीभूत असल्याचे बोलले जाते.