यंदा रब्बीचे क्षेत्र २५ हजार हेक्टरने घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:07 IST2018-11-03T22:06:40+5:302018-11-03T22:07:08+5:30
यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीपासह रब्बी हंगाम सुध्दा अडचणीत आला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता कमी असून रब्बीच्या लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टरने घट होणार आहे.

यंदा रब्बीचे क्षेत्र २५ हजार हेक्टरने घटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीपासह रब्बी हंगाम सुध्दा अडचणीत आला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता कमी असून रब्बीच्या लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टरने घट होणार आहे.
जिल्ह्यात खरीपात दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तर ५० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. सिंचन प्रकल्पातील पाणी साठा आणि परतीचा पाऊस यावर रब्बी हंगामाचे बरेच गणित अवलंबून असते. जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस होतो. मात्र यंदा सप्टेबरपर्यंत केवळ ९३० मि.मी.पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने आणि सप्टेबरनंतर पाऊस बेपत्ता झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा होता. एका पावसाअभावी धानपिके संकटात आल्याने पुजारीटोला, इटियाडोहसह इतर प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ३० ते ४० टक्के पाणी शिल्लक आहे. यापैकी २५ टक्के पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाते. त्यानंतर शिल्लक राहणारे पाणी रब्बी पिकासाठी सोडले जाते. मागील वर्षीसुध्दा अत्यल्प पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तीच स्थिती यंदा देखील असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड करणे टाळले आहे. त्यामुळेच कृषी विभागाने सुध्दा यंदा केवळ २५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांच्या कालावधीत यंदा प्रथमच रब्बीच्या लागवड क्षेत्रात २५ हजार हेक्टरने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
कठाण उत्पादन घटणार
यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. तर खरीपानंतर रब्बीत चना, तूर, मूंग तसेच कठाण पिकांची लागवड केली जाते. मात्र पाऊस आणि थंडी अभावी यंदा कठाण मालाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ही स्थिती संपूर्ण विदर्भात राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.