महिलांनी संकुचित वृत्ती नाकारावी
By Admin | Updated: March 15, 2015 01:40 IST2015-03-15T01:40:21+5:302015-03-15T01:40:21+5:30
आजघडिला महिला वर्ग पुरूषांच्या बरोबरीने पुढे येत आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी घेतली. राजकीय क्षेत्रातही महिलांनी ५० टक्के आरक्षण प्राप्त झाले आहे.

महिलांनी संकुचित वृत्ती नाकारावी
बोंडगावदेवी : आजघडिला महिला वर्ग पुरूषांच्या बरोबरीने पुढे येत आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी घेतली. राजकीय क्षेत्रातही महिलांनी ५० टक्के आरक्षण प्राप्त झाले आहे. राजकीय जीवनात पदार्पम करून महिलांनी आपले कौशल्य, संघटनशक्ती, कर्तव्यपरायणता सिद्ध करण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांचे गुणोत्तर प्रमाण कमी आहे, ही चिंतेची बाब आहे. महिलांचा विकास व्हावा यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यासाठी महिलांनी मनात संकुचित वृत्ती न बाळगता सहकार्याची भूमिका आत्मसात करून महिलांच्या विकासासाठी कार्यरत राहावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अरविंद शिवणकर यांनी केले. एकात्मिक बाल विकास प्रक ल्प अंतर्गत ग्राम खांबी येथे १३ मार्च रोजी घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
उद्घाटन पंचायत समिती सभापती तानेश ताराम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उपसभापती पोमेश्वर रामटेके, जिल्हा परिषद सदस्य मधूकर मरसकोल्हे, गट विकास अधिकारी जी.डी. कोरडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू भेंडारकर, सरपंच शारदा खोटेले, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार, उपसरपंच प्रमोद खोेटेले, नेमीचंद मेश्राम, सुदेश खोटेले उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व शारदामातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. पुढे बोलताना शिवणकर यांनी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएलची अट मारक असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले. तर आजची महिला अबला नसून सबला आहे.
आरक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आपली कर्तव्यपरायणता दाखवावी. घराला सुसंस्कारित ठेवणारी महिलाच कुटुंबाला निश्चितपणे पुढे नेते असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान पाहुण्यांनीही आपले विचार मांडले.
याप्रसंगी किशोरवयीन मुली तसेच आंगणवाडीतील मुलांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. तर महिलांची पाककला, हस्तकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच पाककलेतील विजेत्या योगीता खोटेले, संतोषी साखरे, हस्तकला स्पर्धेत अमीशा उरकुडे, प्रीती उरकुडे तर रांगोळी स्पर्धेत प्रतिज्ञा दहिवले, प्रगती शिवणकर या विजेत्या ठरल्या असून त्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
बाल विकास प्रकल्प अधिकारी निशा आगाशे यांनी संचालन करून प्रास्ताविक मांडले. आभार उर्मिला खोब्रागडे यांनी मानले. मेळाव्याला धाबेपवनी, नवेगावबांध, चाना-बाक्टीमधील अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. (वार्ताहर)