अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे विभागाने अद्यापही रेल्वे गाड्या सुरळीतपणे सुरू केल्या नाही. सध्या केवळ विशेषच गाड्या सुरू असून त्यातच आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येत नाही. या विशेेष गाड्यांना अद्यापही जनरल डबे जोडण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाहेरगावी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येत नसल्याने आणि जनरल डबे जोडले नसल्याने गोरगरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय रेल्वेने प्रवास करणेसुध्दा अवघड झाले आहे. रेल्वे विभागाने किमान सणासुदीच्या दिवसात तरी रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडून आणि विशेष गाड्यांचा दर्जा काढून नियमित गाड्या सुरू कराव्या, अशी अपेक्षा होती. पण प्रवाशांच्या या अपेक्षांवर रेल्वे विभागाने पूर्णपणे पाणी फेरले आहे.
पॅसेंजर लोकल अद्यापही रुळावर नाही - रेल्वे विभागाने मागील दीड वर्षांपासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या. इतर गाड्या सुरु केल्या पण पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू न करण्याचे कारण रेल्वेने अद्यापही स्पष्ट केले नाही.
सुरू असलेल्या विशेष गाड्या- हावडा-मुंबई मेल- अहमदाबाद-पुरी- अजमेरी-मुरी- आझाद हिंद एक्स्प्रेस- समता एक्स्प्रेस- पुणे-हावडा मेल- जबलपूर-चांदाफोर्ट- नागपूर-रायपृूर
स्पेशल तिकिटाची खिशाला कात्री - कोरोना संसर्ग काळात रेल्वेने विशेष गाड्या सुरू करीत त्याच्या तिकीट दरात दुप्पट वाढ केली होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आली असताना सुध्दा विशेष गाड्या नियमित करून वाढविलेले तिकिटाचे दर कमी केले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावरील भुर्दंड अजूनही कायम असून प्रवासी तिकीट दर केव्हा कमी होतील याकडे लक्ष लावून आहेत.
प्रवासी काय म्हणतात..........कोरोनाचे कारण पुढे करीत रेल्वे विभागाने प्रवाशांची लूट चालविली आहे. परिस्थिती सर्वसामान्य झाली असून अद्यापही नियमित गाड्या सुरू केल्या नसून विशेष गाड्यांचा दर्जा कायम ठेवून प्रवाशांच्या खिशावरील भूर्दंड कायम ठेवला आहे. ही एकप्रकारची प्रवाशांची लूटच आहे. - कान्हा गुप्ता, प्रवासी
लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आल्या नसल्याने गोरगरीब प्रवाशांना मागील दीड वर्षांपासून आर्थिक भूर्दंड बसत आहे. कोरोना काय केवळ याच गाड्यांमधून होतो काय हे सुध्दा कळायला मार्ग नाही. तर रेल्वेला अद्यापही जनरल डबे न जोडल्याने प्रवाशांना तिकिटाचा दुप्पट फटका बसत आहे.- मनीष पाल, प्रवासी
रेल्वे बोर्डाकडे बोट सणासुदीच्या काळात लोकल, पॅसेंजर आणि इतर गाड्या नियमितपणे सुरू करुन रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्यापही कुठलेही निर्देश मिळाले नाही. जोपर्यंत रेल्वे बोर्डाकडून यासंदर्भात सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत यावर काही बोलता येणार नाही. - जनसंपर्क अधिकारी रेल्वे,