वसतिगृहाला होतोय टँकरने पाणीपुरवठा
By Admin | Updated: February 4, 2015 23:17 IST2015-02-04T23:17:13+5:302015-02-04T23:17:13+5:30
क्षेत्रातील आदिवासी मुलींना राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून आदिवासी विभागातर्फे मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येकी अडीच कोटी रुपये खर्चुन दोन वसतीगृहांचे बांधकाम करण्यात आले आहे.

वसतिगृहाला होतोय टँकरने पाणीपुरवठा
देवरी : क्षेत्रातील आदिवासी मुलींना राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून आदिवासी विभागातर्फे मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येकी अडीच कोटी रुपये खर्चुन दोन वसतीगृहांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु सुरूवातिपासूनच या वसतीगृहात पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे व विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही या वस्तीगृहाला सकाळी व सायंकाळी खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
सन २०१२ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या वसतीगृहाला जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे उद्घाटनाकरीता तब्बल दोन वर्ष वाट पाहावी लागली. अखेर १० जानेवारी २०१४ मध्ये खासदार मारोतराव कोवासे व माजी आमदार रामरतन राऊत यांच्या हस्ते या वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्घाटनकरुन त्याचे श्रेय लाटणाऱ्या जनप्रतिनिधिंनी या वस्तीगृहाच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले. तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे ५०० रुपये टँकरच्या दराने दररोज तीन ते चार टँकर पाणी मागवून आदिवासी मुलींना पाण्याची सोय केली जात आहे.
सध्या या दोन्ही वसतीगृहात १९० मुली राहत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या १९० मुलींकरीता दररोज दोन हजार रुपये खर्चुन पाणी टँकरने मागविण्यात येत आहे. परंतु प्रकल्प कार्यालयाद्वारे पर्यायी व्यवस्थेचा मार्ग काढल्या जात नसल्याचे बघायला मिळत आहे.
वसतीगृहासमोर फार मोठी विहीर बांधली आहे, परंतु त्या विहिरीत पाणीच नाही. विशेष म्हणजे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून सर्व विभागांना कोट्यवधींच्या योजना पुरविल्या जातात.
परंतु स्वत:च्या कार्यालयांतर्गत वस्तीगृहाला पाण्याचे नियोजन करण्यात विभाग अपयशी ठरत आहे. (प्रतिनिधी)