टिकारामटोल्यातील घरांना जबरदस्तीने उठवणार नाही
By Admin | Updated: August 3, 2014 23:26 IST2014-08-03T23:26:55+5:302014-08-03T23:26:55+5:30
तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या टिकारामटोला येथील रहिवाशांना जबरदस्तीने आणि नियमबाह्यपणे उठविले जाणार नाही. त्यांच्या बाबतीमधील सर्व कार्यवाही

टिकारामटोल्यातील घरांना जबरदस्तीने उठवणार नाही
एसडीओ महिरे : प्रकल्पग्रस्तांना वेळ देणार
गोंदिया : तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या टिकारामटोला येथील रहिवाशांना जबरदस्तीने आणि नियमबाह्यपणे उठविले जाणार नाही. त्यांच्या बाबतीमधील सर्व कार्यवाही नियमानुसारच होईल, अशी भूमिका तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना काही दिवसांकरिता दिलासा मिळाला आहे.
अदानी विद्युत प्रकल्पासाठी लाागणाऱ्या भूमिगत रेल्वे लाईनच्या कामासाठी परिसरातील काही गावे उठवून त्यांचे पुनर्वसन केले जात आहे. त्यात टिकारामटोला येथील पाच घरमालकांनी अपेक्षित मोबदला न मिळाल्यामुळे तेथून हटण्यास नकार दिला आहे. गुरूवारी (दि.३१) तिरोडा एसडीओंकडे झालेल्या सुनावणीत त्यांनी गावातून हटण्यास तयार नसल्याचे एसडीओंना स्पष्टपणे सांगितले.
वास्तविक शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार प्रकल्पबाधित गावकऱ्यांना त्यांची इच्छा नसतानाही हटविता येत असले तरी त्यासाठी सुनावणीनंतर ४५ दिवसांचा अवधी द्यावा लागतो.
या कालावधीत बाधित प्रकल्पग्रस्त नागरिक वरिष्ठांकडे याबाबत अपिलही करू शकतात. परंतू त्यांना तो कालावधी न देताच त्यांच्या घरांवर बुलडोजर चालविण्यासाठी दबाव आणला जात असल्यामुळे त्या नागरिकांमध्ये असंतोष आणि दहशतीची भावना पसरली आहे. यातील एका नागरिकाने आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (जिल्हा प्रतिनिधी)