चक्क मृताच्या नावे मंजूर केले घरकुल; नवेगावबांध ग्रामपंचायतीमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 13:06 IST2022-04-14T13:02:48+5:302022-04-14T13:06:42+5:30
या प्रकरणाची चौकशी करुन दाेषींवर कारवाई करावी, अशी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

चक्क मृताच्या नावे मंजूर केले घरकुल; नवेगावबांध ग्रामपंचायतीमधील प्रकार
नवेगावबांध (गोंदिया) : नवेगावबांध ग्रामपंचायती अंतर्गत पंतप्रधान आवास योजना सन २०१९ - २०मध्ये श्री रामकृष्ण इस्तारी पुराम यांना घरकुल मंजूर करण्यात आले. परंतु त्यांचा १२ ऑगस्ट २०१३ रोजी मृत्यू झाला आहे. मग ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी ग्रामसभा ठराव क्रमांक ११ नुसार २९ ऑगस्ट २०१६ रोजी तब्बल तीन वर्षानंतर ठराव घेऊन पंतप्रधान आवास योजनेत निवड करून लाभ दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या व्यक्तीचे जुने घर क्रमांक ८१७ वाॅर्ड क्रमांक २ मध्ये आहे. नवेगावबांध येथील उपसरपंचांच्या वॉर्डात आहे. मात्र, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करताच सर्व निधीची उचल करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे सरपंचाच्या गावातील मृत व्यक्तीचे घर चोरीला गेले असून, त्याचा शोध आता स्वर्गात जाऊन घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रभान बर्वे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गोंदिया यांच्याकडून गटविकास अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली करणाऱ्या सरपंच व सचिवावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.
मृतक व्यक्तीच्या नावे घरकुल मंजूर झाले असल्यास त्यांच्या वारसदाराला घरकुल देण्याचा नियम शासकीय जीआरमध्ये आहे. याबाबत सर्व तपासणी करण्याचे अधिकार पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांना असून, या प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतीचा कुठलाही संबंध येत नाही.
- पी. आर. चव्हाण, सचिव, ग्रामपंचायत, नवेगावबांध.
मृत व्यक्तीचे नाव यादीमध्ये होते व वारसदारांनी मागणी केल्यानंतर त्या व्यक्तीचे घरकुल वारसदारांना देण्याची तरतूद असल्यामुळे ते घर त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे मृत व्यक्तिला घरकुल नसून ते त्यांच्या वारसाला दिलेले आहे. सर्व प्रक्रिया ही नियमानुसारच करण्यात आली आहे. तक्रारकर्त्यांनी केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत.
-अनिरुद्ध शहारे, सरपंच, ग्रामपंचायत, नवेगावबांध