नागपूर-गोंदिया पॅसेजरवर वाढतोय प्रवाशांचा ताण
By Admin | Updated: February 7, 2015 23:26 IST2015-02-07T23:26:09+5:302015-02-07T23:26:09+5:30
ईतवारी (नागपूर) ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पॅसेंजर गाड्या ‘हाऊसफुल्ल’ होऊन प्रवाशांना मोठा

नागपूर-गोंदिया पॅसेजरवर वाढतोय प्रवाशांचा ताण
गोंदिया : ईतवारी (नागपूर) ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पॅसेंजर गाड्या ‘हाऊसफुल्ल’ होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करून कसातरी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या स्थानकांदरम्यान पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी १५ तास ईतवारी रेल्वेस्थानकात उभ्या राहणाऱ्या टाटानगर पॅसेंजरचा वापर करावा, अशी मागणी काही सूज्ञ रेल्वेप्रवाशांनी केली आहे.
टाटानगर-ईतवारी (५८१११) ही रेल्वे गाडी गोंदिया स्थानकावर पहाटे ३.२० वाजता येते व पहाटे ३.३० वाजता सुटते. सकाळी ६ वाजतापर्यंत सदर गाडी ईतवारी रेल्वे स्थानकात पोहचते. त्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासाठी सदर गाडी (५८११२) ईतवारी स्थानकातून टाटानगरसाठी रात्री ९.३० वाजता सुटते. ही गाडी दिवसभर तब्बल १५ तासपर्यंत इतवारी रेल्वे स्थानकावर थांबूनच असते. या कालावधी सदर गाडीचा उपयोग करून प्रवाशांना सेवा दिली जावू शकते.
सदर गाडी १५ तास ईतवारी रेल्वे स्थानकावर अकारण थांबून राहत असल्याने रेल्वेच्या महसुलात कोणतीही वाढ होत नाही. मात्र या कालावधीत सदर गाडीच्या ईतवारी ते गोंदिया जंक्शनपर्यंत दोन फेऱ्या होवू शकतात. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा होईल व रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची आशा आहे.
गोंदिया ते ईतवारी रेल्वे स्थानकादरम्यान पॅसेंजर गाडीचे गंगाझरी, काचेवानी, तिरोडा, मुंडीकोटा, तुमसर रोड, कोका, भंडारा रोड, खात, रेवराल, चाचेर, सालवा, कन्हान, कामठी, कलमना इत्यादी थांबे येतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशी बसतात. शिवाय गोंदिया व इतवारी या थांब्यांवरून बसणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठीच असते. त्यामुळे टाटानगर-ईतवरी या पॅसेंजर गाडीचा उपयोग दिवसा ईतवारी ते गोंदिया प्रवाशाच्या दोन फेऱ्यासाठी केला जावू शकते. त्यामुळे गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रवाशी लाभान्वित होतील व रेल्वेच्या महसुलातही भर होईल.
त्यामुळे सदर गाडीच्या ईतवारी ते गोंदिया दरम्यान फेऱ्या वाढविण्याची मागणी होत असून लोकप्रतिनिधी व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)