इमारती बोलक्या, शिक्षणाचा अभाव
By Admin | Updated: July 22, 2015 02:00 IST2015-07-22T02:00:02+5:302015-07-22T02:00:02+5:30
सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांची पूर्तता झाली असली तरी ...

इमारती बोलक्या, शिक्षणाचा अभाव
पदाधिकारी-अधिकारी निर्धास्त : गोरगरिबांच्या शिक्षणाचा वाली कोण ?
वाताहत शिक्षणाची
संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव
सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांची पूर्तता झाली असली तरी जि.प. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या गचाळ नियोजनामुळे शाळांची वाताहात होत आहे. राजकारणाच्या माध्यमातून जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून धनदांडगे शिक्षणसम्राट हे जि.प.च्या शाळा बंद पाडण्याचा कुटील डाव रचत असल्याशी शंका या परिस्थितीमुळे घेतली जात आहे.
येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या काळातही गोरगरीबांचे हे शैक्षणिक दालन डौलाने उभे आहे. गुणवत्तेच्या बाबतीत येथे अगदी निष्णात शिक्षकवृंद आहे. मात्र जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या शाळेमध्ये हजारावर गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. कला व विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय नावाला आहे. मात्र येथे कला शाखेत राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र या विषयाचे कनिष्ठ व्याख्याते नाहीत. विज्ञान शाखेत रसायनशास्त्रासाठी कनिष्ठ व्याख्याता नाही. कला व विज्ञान शाखेत जर व्याख्याने नसतील तर विद्यार्थ्यांना काय शिक्षण मिळत असेल, याचा विचारच केलेला बरा.
शिक्षक हे दारोदारी भटकंती करून कसेबसे विद्यार्थी मिळवत शाळा चालविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पालकही आज ना उद्या सर्व विषयांचे शिक्षक मिळतील अशी आशा बाळगतात. पण शेवटी आमच्या पाल्यांशी विश्वासघात केल्याचा ठपका या शिक्षकवृंदांवर लागतो. ज्यांच्या हातात जिल्हा परिषदेची सत्ता आहे ते लोकप्रतिनिधी व प्रशासन सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी मात्र नामनिराळेच असतात.
दुसरीकडे खासगी शाळांतील एक जरी शिक्षक दीर्घ रजेवर गेल्या तरी खासगी संस्था चालक त्याची शिक्षणाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेऊन ती जागा तात्पुरती भरतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण वाया जात नाही. मात्र जिल्हा परिषदेचे बिचारे विद्यार्थी अनुभवी शिक्षकांपासून वंचित होतात. अशा या गचाळ व्यवस्थेला जबाबदार कोण? असा प्रश्न पडतो. शाळेतील एका इमारतीचा स्लॅब पूर्णत: बसला. भेगा पडल्या आहेत. एखाद्या वेळी या इमारतीत दुर्घटना होऊ शकते. अनेकदा तक्रारी झाल्या, पण दुर्लक्ष केले जात आहे.
लोकप्रतिनिधी फिरवितात पाठ
वर्षानुवर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. कुठल्यातरी निमित्ताने लोकप्रतिनिधींनी यावे म्हणून कार्यक्रमात त्यांना आमंत्रण दिले जाते. समस्या त्यांचेजवळ विषद कराव्यात हा यामागील हेतू असतो. मात्र ते सुध्दा या आमंत्रणाला पाठ दाखवितात. विधानसभेत नेतृत्व करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे याच मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अस्ताकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र शासनाकडे मांडावे, अशी येथील जनतेची रास्त अपेक्षा आहे.
ती विहीर ठरू शकते ‘मौत का कुआ’
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात एक पुरातन विहीर आहे. या विहिरीला लागून असलेले सिमेंट कॉक्रीटचे थर खचले आहे. या थराच्या खाली भलेमोठे भगदाड पडले आहे. शाळेत दोन पाण्याच्या टाक्या आहेत पण शाळेच्या पटसंख्येमुळे पाणी अपुरे पडते. विद्यार्थी विहिरीकडे धाव घेतात. एखादे वेळी दुर्घटनेची शक्यता टाळता येत नाही. नगर पंचायत प्रशासनाला याची सूचना देण्यात आली, मात्र प्रशासकांचे अशा गंभीर समस्येकडे संपूर्णत: दुर्लक्ष आहे. शालेय प्रशासनाने तात्पुरते कुंपन घालून विद्यार्थ्यांना प्रवेश बंद केला आहे. परंतु विद्यार्थी दशेतील उनाडपणामुळे एखादे वेळी तो ‘मौत का कुआ’ ठरू शकतो. वर्षानुवर्षापासून या विहिरीतील गाळ उपसा केलेला नाही. उन्हाळ्यात विहीरीत पाणी नसते.
शौचालयांची दुरवस्था
४बांधकाम हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. येथे एक शौचालय तयार झाले, मात्र त्याचा एकही दिवस विद्यार्थ्यांनी वापर केला नाही. या शौचालयातील दारे तुटलेली आहेत. बैठक व्यवस्था पूर्णत: नेस्तनाबूत झाली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात मोकळे रान असल्याने उनाड मुले तोडफोड करतात. आवारभिंतीची प्रदीर्घ काळापासून मागणी आहे. मात्र या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने कानाडोळा करीत आहे.