विद्यार्थी सुरक्षित, पण सुविधांचा अभाव
By Admin | Updated: July 20, 2016 01:24 IST2016-07-20T01:24:17+5:302016-07-20T01:24:17+5:30
जिल्ह्यातील बराच भाग आदीवासीबहुल आहे. त्यामुळे आदीवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

विद्यार्थी सुरक्षित, पण सुविधांचा अभाव
आश्रमशाळांतील दाहक वास्तव : बोलक्या इमारतींमधील गुणवत्तेची कदर होणार का?
गोंदिया : जिल्ह्यातील बराच भाग आदीवासीबहुल आहे. त्यामुळे आदीवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय आश्रमशाळांसोबत खासगी संस्थांच्या आश्रमशाळाही शासनाकडून पोसल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात या आश्रमशाळांमध्ये राहणारे विद्यार्थी किती सुरक्षित आहेत याची पाहणी करण्याचा प्रयत्न ‘लोकमत’च्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी केला. यात सुरक्षेच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात समाधानकारक वातावरण असले तरी इतर सुविधांच्या बाबतीत अधिक लक्ष घालण्याची गरज दिसून आली.
कोट्यवधीच्या खर्चाला भकासपणाची वाळवी
अर्जुनी-मोरगाव : आदिवासी बालक-बालिका, युवक-युवती शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी दरवर्षी शासन कोट्यवधींचा खर्च करीत आहे. मात्र अनेक खासगी संस्थांनी उभारलेल्या आश्रमशाळांच्या केवळ इमारतीच बोलक्या आहेत. प्रत्यक्ष आश्रमशाळांत दाहक वास्तव व भकास जीवन असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केल्यास या शाळा बऱ्याच प्रमाणात सुरक्षित आहेत असे म्हणता येईल. मात्र खर्चाच्या तुलनेत शिक्षणाचा आणि इतर सुविधांचा दर्जा मात्र दिसत नाही.
सोयी-सुविधांसाठी होणारा खर्च नेमका कुणाच्या खिशात जातो हा यक्षप्रश्न आहे. या संस्थांकडून किती प्रमाणात निकषांची पूर्तता होते यावरही शंकाच आहे. आश्रमशाळा चालविणारे व राजकीय वरदहस्त लाभलेले धनदांडगे संस्थाचालक त्या विद्यार्थ्यांबद्दल किती तळमळीने सेवा देतात हे या शाळांना प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर समजून आल्याशिवाय राहात नाही.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात बुधेवाडा, सिरेगावबांध, देवलगाव, येरंडी, धाबेपवनी, गोठणगाव, केशोरी व एक शासकीय अशा एकूण ८ आश्रमशाळा आहेत. बहुतांश आश्रमशाळांच्या इमारती बोलक्या आहेत. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षण व सोयीसुविधांचा अभाव आहे. काही खासगी आश्रमशाळांमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. पावसाळ्याच्या दिवसात सयंत्राची आवश्यकता आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठ्याच्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. विहीर व बोअरवेलच्या पाण्यात ग्रामपंचायतमधील ब्लीचिंगचा वापर करून जलशुद्धीकरण केले जाते.
विद्यार्थ्यांना आंघोळ करण्यासाठी गरम पाणी मिळावे यासाठी सोलर वॉटर सिस्टमची आवश्यकता आहे. केवळ शासकीय आश्रमशाळांना पुरवठा झाला, मात्र बहुतांश आश्रमशाळांमध्ये सोलर वॉटर सिस्टम कार्यान्वितच नाही. विद्यार्थी-विद्यार्थिनींना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. या भीतीपोटी बरेच विद्यार्थी आंघोळच करीत नाही.
काही आश्रमशाळांमध्ये सकाळी वर्ग भरतात, त्याच खोलीत रात्री झोपायची व्यवस्था होते. झोपायला स्वतंत्र जागा नाही. मुबलक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. अभ्यास करण्यासारखे पोषक वातावरण नाही. स्वच्छता, आरोग्य, स्टेशनरीचा अभाव, निकृष्ट भोजन, राहण्या-खाण्याची दयनीय अवस्था आहे.
पुस्तक हे विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण भांडवल आहे. सुखसोयी नकोत, मात्र चांगली पुस्तकं द्या, अशी आळवणी विद्यार्थी करताना दिसतात. मात्र त्याचा अभाव दिसून येतो. विज्ञान लॅब, संगणक कक्ष, स्वतंत्र वाचनालय, वृत्तपत्र या सुविधा काही अनुदानित आश्रमशाळांमध्ये कागदोपत्रीच राबविल्या जातात. तरीही काही आश्रमशाळा याला अपवाद आहेत.
काही शिक्षण संस्थांनी इथेही आपली घराणेशाहीची परंपरा कायम ठेवली आहे. घरातीलच व्यक्ती आश्रमशाळेत कामाला असतात. नोकरी न करता पगाराची उचल करतात. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सोसावा लागतो. संस्थेतील शिक्षक म्हटला तर तो घाबरणारा प्राणी असतो. आश्रमशाळांवर येणारी संकटे व संस्थाचालकांची घरातील मंगलकार्ये यात शिक्षकांचा खारीचा वाटा असतो. कर्मचाऱ्यांना हे सर्व मुकाट्याने सहन करावे लागते. कर्मचारी उघडपणे बोलत नसले तरी दबक्या आवाजात मात्र चर्चा करतात.
बहुतांश आश्रमशाळा गावाबाहेर शेतीच्या जागेत कार्यरत आहेत. या ठिकाणांवरील बांधकाम तसेही जोखमीचे आहे. सर्प, विंचू व अन्य विषारी जीवजंतुची सदैव भीती असते. यापासून बचावाच्या दृष्टीने तालुक्यातील बहुतांश आश्रमशाळांमध्ये सुरक्षा भिंती आहेत. पुरेपूर सुरक्षा नसली तरी बऱ्याचअंशी काळजी घेतली जात आहे. आदिवासींच्या मुला-मुलींच्या कल्याणात अकल्याण होत असताना आदिवासी नेते मात्र आवाज उठवित नाही. आदिवासी मंत्रीसुद्धा वसतीगृह व आश्रमशाळांकडे फिरकताना दिसून येत नाही. प्रकल्प विभागाच्या तपासणी पथकाने अधिक कार्यक्षम होणे गरजेचे झाले आहे.
यवतमाळमधील घटनेमुळे आश्रमशाळा प्रशासन सतर्क
सालेकसा : यवतमाळ जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनेतून आश्रमशाळेचा विद्यार्थी दगावल्यामुळे सर्वत्र आश्रमशाळा सावध झाल्या आहेत. सालेकसा तालुक्यात एकूण तीन आश्रमशाळा असून यात शासकीय आश्रमशाळा जमाकुडो, शासकीय आश्रमशाळा बिजेपार या शासनाच्या देखरेखीत आहेत. कचारगड आदिवासी आश्रमशाळा पिपरिया ही शाळा खासगी व्यवस्थापकाची आहे.
आतापर्यंत या शाळांमध्ये सर्पदंश, विंचू दंश किंवा कोणतेही सरपटणारे प्राणी दंश केल्याची घटना घडली नाही. परंतु शाळेच्या परिसराला एकीकडे शेतीचा भाग तर दुसरीकडे जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे या आवारात सरपटणारे प्राणी येण्याची दाट शक्यता असते. ही बाब लक्षात घेता येथे शालेय प्रशासन विशेष लक्ष घालत आहे.
शाळेने पालकवर्गाची एक सुरक्षा समिती बनवली आहे. तसेच परिसरात स्वच्छतेवर भर दिला जात असून शालेय परिसरात फिनाईल, ब्लिचिंग पावडरचा वापर तसेच इतर केमिकल्सचा उपयोग केला जातो, अशी माहिती माध्यमिकचे मुख्याध्यापक हेमंत बनोठे यांनी दिली. या शाळेला मजबूत आवारभिंत आहे. आवारात मुलांना दिनचर्येप्रमाणे ठराविक वेळ व कमी ठिकाणी खेळण्याची परवानगी असते. त्यांच्या अवतीभोवती एक दोन कर्मचारी सतत देखरेख करतात, असेही त्यांनी सांगितले. तरीसुद्धा सर्पदंश किंवा विंचूदंश यासारखी घटना केव्हाही घडू शकते, म्हणून चारचाकी वाहनाची सोय २४ तास ठेवली जात आहे.
पावसाळ्यात घेतली जाते विशेष काळजी
सडक-अर्जुनी : तालुक्यातील खडकी-बाम्हणी येथील स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेत पावसाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी वरती मजल्यावर व्यवस्था केली आहे. या शाळेत मुलांची व मुलींची निवास व्यवस्था स्वतंत्र केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत साप, विंचू यापासून बचाव करण्यासाठी शाळा परिसर कचरामुक्त केला आहे. कचरा नष्ट करण्यासाठी तणनाशक औषधांची फवारणी केली आहे. साप, विंचू यांना लपून राहण्यासाठी जागाच नाही.
परिसरातील डबक्यातील पाणी वाहते केले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होत नाही. त्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. या आश्रमशाळेत विद्यार्थी संख्या ३३३ असून वर्ग पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. सर्व मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी तपासणी केली जाते.
यासोबतच कोकणा-जमी येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रमशाळेत वर्ग पहिली ते बारावीपर्यंतचे ६५० विद्यार्थी विद्यार्जन करतात. आश्रमशाळेतील मुला-मुलींना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. पावसाळ्यात विद्यार्थी वरच्या मजल्यावर राहात असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून बचाव होत आहे. सरपटणारे प्राणी परिसरात राहू नये यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली आहे. परिसर स्वच्छ ठेवल्या जातो. मुलांसोबत राहण्यासाठी रात्रपाळीत दोन पुरुष व दोन महिला कर्मचाऱ्यांची नोकरी लावली जात आहे. या आदिवासी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून नेहमीच तपासणी केली जात असल्याचे तेथील मुख्याध्यापकांनी सांगितले. (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून)
पावसाळ्यांत मुलांना सर्पदंश किंवा कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून स्वच्छतेबद्दल वेळोवेळी निर्देश व सल्ला देण्यात येतो. मुलांची सुरक्षा व्यवस्थापनाच्या अधिन आहे.
- वाय.सी. भोयर
गटशिक्षणाधिकारी, सालेकस