सुरक्षेच्या दृष्टीने १५ जुलैनंतर वर्ग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:58+5:30

संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा १ जुलैपासून सुरु करण्यास विविध अडचणी शासकीय व खाजगी शिक्षण संस्थाचालकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळा केव्हा व कशाप्रकारे सुरू कराव्या यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा ऑनलाईन घेण्यात आली.

Start classes after July 15 for safety reasons | सुरक्षेच्या दृष्टीने १५ जुलैनंतर वर्ग सुरू करा

सुरक्षेच्या दृष्टीने १५ जुलैनंतर वर्ग सुरू करा

ठळक मुद्देशिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना : संघटनेच्या सभेत घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुुनी-मोरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यातही पावसाळा हा आजारांचा काळ असून सर्दी-खोकला व ताप असे आजार बळावतात. अशात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १ जुलैपासून इयत्ता ९, १० व १२ वीचे ऑनलाईन वर्ग तर १५ जुलै नंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेने घेतला आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा १ जुलैपासून सुरु करण्यास विविध अडचणी शासकीय व खाजगी शिक्षण संस्थाचालकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळा केव्हा व कशाप्रकारे सुरू कराव्या यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा ऑनलाईन घेण्यात आली. सभेत मानव विकास योजना व महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस अद्याप सुरू न झाल्याने ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण- येणे शक्य होणार नाही. पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकला असे विविध आजार वाढतील हा गंभीर प्रश्न आहे. संस्थाचालक व शाळा व्यवस्थापन समितीवरच शाळा सुरू करण्यासाठी संपूर्णपणे जबाबदारी टाकने योग्य वाटत नाही. काही मोठ्या शाळांची विद्यार्थी संख्या हजारोंच्या घरात असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य उपाययोजनांचे पालन करणे शक्य होणार नाही. त्यात शाळा सुटल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग कसे बघणार हा गंभीर प्रश्न निर्माण होईल व शाळेसाठी ही फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
समाज कल्याण विभागांतर्गत वस्तीगृह सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांच्या राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. या सर्व समस्येबाबत पालकांशी चर्चा केल्यानंतर नियम व जबाबदारी घेण्यासाठी पालकांची मानसिकता दिसून येत नाही. ग्रामपंचायतने शाळांचे तात्पुरते निर्जंतुकीकरण करून दिले असले तरी साबण, मास्क, सॅनिटायजर इत्यादी साहित्य कसे घ्यावे हा आर्थिक प्रश्न शाळेसमोर असून या सर्व विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर जुलै पासून ऑनलाइन तर १५ जुलै नंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला असून तसे निवेदन संघातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना (माध्यमिक) देण्यात आले आहे. सभेला प्राचार्य अनिल मंत्री, भाऊराव पत्रे, किशोर शंभरकर, मधुसूदन अग्रवाल, दिलीप चाटोरे, व्ही.टी. पटले, वैद्य, के. सी. शहारे, मनोज भुरे, कोल्हारे, प्राचार्या बेग , ए. टी. डुंबरे, मेंढे, टेंभुर्णीकर, टी. एस. गौतम, हेमंत पटले, जीवानी, वासनिक, व्ही. डी. मेश्राम, दिलीप टेंभरे आदि उपस्थित होते.

पालकांमध्येही जुलैनंतरचा सुरू
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा या १५ जुलैनंतरच सुरू करण्यात याव्या असा सूर जिल्ह्यातील पालकांमध्ये आहे. पालक समित्यांमध्ये सुध्दा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता आणि कोरोना संक्रमणाला वेळीच आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. शालेय अभ्यासक्रम हा कसा तरी पूर्ण करता येईल. मात्र त्यासाठी शाळा सुरू करण्याकरिता घाई करु नये, असेच मत पालकांचे आहे.

Web Title: Start classes after July 15 for safety reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा